![]()
राज्याच्या काही भागांत नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे शेतीचे आणि विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे अतोनात नुकसान झाले असून, याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जळगाव जिल्ह्यातून तब्बल चार मंत्री राज्य मंत्रिमंडळात असतानाही, केवळ रक्षा खडसे यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही मंत्र्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली नाही, असा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे म्हणाले, या मंत्र्यांना विधान परिषदेच्या घोडेबाजार करण्यात रस जास्त आहे. मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, माझेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मंत्री असूनही त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली नाही. वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली आहेत. विक्रीसाठी तयार झालेला माल या वादळी वाऱ्याने आणि पावसामुळे मातीमोल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सलग तीन दिवस जळगाव जिल्ह्यात वादळी पाऊस सलग तीन दिवस कोसळलेल्या वादळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. रावेर, यावल, जळगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह आलेल्या वादळाने केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाल्या आहेत. रावेर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून निरुळ, पाडळे खुर्द, पाडळे बुद्रूक, अटवाडे, खिर्डी, ऐनपूर, रसलपूर या गावांसह मुक्ताईनगर तालुक्यातील तापीकाठच्या परिसरातील बागाही भुईसपाट झाल्या आहेत. जळगाव तालुक्यातील फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द आणि आव्हाणे, चोपडा तालुक्यातील गोरगावले, माचले, मंगरूळ, वर्डी, खर्डी, पंचक व धानोरा तसेच यावल तालुक्यातील किनगाव, मनवेल, न्हावी आणि थोरगव्हाण या परिसरांनाही वादळाचा जबर तडाखा बसला आहे. पाच तालुक्यांमध्ये मिळून सुमारे पाच हजार हेक्टर केळी पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून बाधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Source link
मंत्र्यांना घोडेबाजारात रस, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही:केळी उत्पादकांच्या कोट्यवधींच्या नुकसानीवरून एकनाथ खडसेंची टीका