![]()
घाटलाडकीसह परिसरातील संत्रा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्याऐवजी कृषी अधिकारी ऑनलाइन माध्यमांवर, झूम बैठकीतून सल्ला देण्यात व्यस्त असल्याचा आरोप शेतकऱ्यांद्वारे केला जात आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधा नसल्यामुळे ऑनलाइन मार्गदर्शनाचा त्यांना कोणताही फायदा होत नाही. त्यामुळे “कृषी विभाग ऑनलाईन, शेतकरी ऑफलाईन” अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून बदलत्या हवामानामुळे संत्रा गळती, बुरशीजन्य आजार आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून अनेकांनी संत्र्याची झाडे तोडण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. या गंभीर परिस्थितीत कृषी विभागाकडून अपेक्षित मार्गदर्शन मिळत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या मते, प्रत्यक्ष शेतात येऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याशिवाय खरी समस्या समजू शकत नाही. केवळ ऑनलाइन सल्ल्यांपेक्षा शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे अधिक प्रभावी ठरेल, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Source link
संत्रा बागा उद्ध्वस्त; कृषी विभागाचा ‘ऑनलाइन’ प्रयोग ठरला अपयशी:कृषी विभाग ऑनलाईन, संत्र्याची झाडे तोडण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय