Headlines

शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आम्ही दुष्काळ विसरलो:ते इंडियातल्या लोकांचे लग्न, आम्ही भारतातले कष्टकरी; लक्ष्मण हाकेंची सुप्रिया सुळेंवर टीका




“राज्यात सध्या भीषण दुष्काळसदृश परिस्थिती असताना आणि शेतकरी हवालदिल झाला असताना, लोकप्रतिनिधींना त्याचे गांभीर्य राहिलेले नाही. शाहरुख खानचा गालगुच्छा घेताना आमचे खासदार राज्यातील दुष्काळ विसरले आहेत,” अशा अत्यंत तिखट शब्दांत ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “हे ‘इंडिया’ मधल्या हायप्रोफाईल लोकांचे लग्न सोहळे आहेत, आम्ही मात्र ‘भारता’मधले सामान्य लोक आहोत,” असा टोलाही त्यांनी लगावला. सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे लग्न पार पडले. या विवाहसोहळ्यात अनेक राजकीय नेत्यांसह बॉलिवडमधील अभिनेता शाहरूख खान यानेही हजेरी लावली होती. या लग्नावरून आता लक्ष्मण हाके यांनी सुप्रिया सुळे यांच्या निशाणा साधला आहे. नेमके काय म्हणाले लक्ष्मण हाके? राज्यातील पाण्याच्या आणि शेतीच्या गंभीर परिस्थितीवर बोलताना लक्ष्मण हाके यांनी सुप्रिया सुळे यांच्या एका व्हायरल प्रसंगाचा संदर्भ देत त्यांच्यावर गंभीर आक्षेप घेतला. ते म्हणाले, “खासदार पदावर असणारी जबाबदार व्यक्ती जर दुष्काळाच्या काळात अशी वागत असेल, तर आम्ही यावर काय व्यक्त व्हावे? एकीकडे शेतकरी पाण्यासाठी आणि आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे, तर दुसरीकडे बडे नेते सेलिब्रिटींच्या गराड्यात मग्न आहेत. आगामी पावसाळी अधिवेशनामध्ये मायबाप सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आश्वस्त करावे आणि राज्यात अधिकृतपणे ‘कोरडा दुष्काळ’ घोषित करावा,” अशी मागणी त्यांनी केली. रोहित पवारांना लगावला खोचक टोला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन करणाऱ्या आमदार रोहित पवार यांनाही लक्ष्मण हाके यांनी सोडले नाही. “राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी रोहित पवारांनी करायला हवी होती. मी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी रोहित पवारांना भेटायला जाणार होतो; पण त्यांनी अवघ्या तिसऱ्या दिवशीच आपले आंदोलन गुंडाळले,” असा खोचक टोमणा त्यांनी मारला. बोगस कुणबी प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा लक्ष्मण हाके यांनी यावेळी मराठवाड्यातील जात प्रमाणपत्रांच्या गैरव्यवहारावर मोठा आरोप केला. ते म्हणाले, “माजलगावमधील एका नगरसेविकेचे कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केले आहे. हाच धागा पकडत हाके यांनी, राज्यात बेकायदेशीरपणे वाटप करण्यात आलेली अशी सर्व कुणबी प्रमाणपत्रे तातडीने रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली.” “महाराष्ट्रात सध्या जात प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी रेट ठरले असून यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. राज्यात ५८ लाख नोंदी मिळाल्याचा दावा करून बोगस कुणबी प्रमाणपत्रे देण्याला मोठी वाव दिली जात आहे. मुख्यमंत्री साहेब, तुम्ही ओबीसींना सवतीच्या लेकरांसारखं का वागवत आहात?” असा उद्विग्न सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. प्रसाद लाड यांच्यावर गुन्हा दाखल करा “आमदार प्रसाद लाड यांचा आरक्षणाशी काहीही संबंध नाही आणि त्यांना या विषयातील कोणतीही अक्कल किंवा ज्ञान नाही. लाड यांनी मनोज जरांगे यांच्याकडे जाऊन विनवण्या करणे हा एक मोठा विनोद आहे. लाड यांना जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांना फोन करण्याचा अधिकार कोणी दिला? ते समित्यांवर दबाव आणत आहेत. त्यामुळे बोगस प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करून आमदार प्रसाद लाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी मागणी हाके यांनी केली. भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाची आजही गरज मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, “भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात नाराज आहेत की नाहीत, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. परंतु, ओबीसी चळवळीत त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला आजही नितांत आवश्यकता आहे. आम्ही कुठे चुकीचे बोलत असू तर भुजबळ साहेबांनी आमचे कान धरले पाहिजेत आणि आम्हाला दिशा दाखवावी,” अशी आदरयुक्त भावना त्यांनी व्यक्त केली. ही लढाई आता केवळ रस्त्यावरची राहिलेली नसून, बोगस प्रमाणपत्रांविरोधात न्यायालयातही तितक्याच ताकदीने लढली जाईल, असा निर्धार त्यांनी शेवटी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *