.

विधान परिषदेवर गेलेल्या जिल्ह्यातील ४ नवनिर्वाचित आमदारांचा शुक्रवारी झालेला सत्कार सोहळा चांगलाच रंगला. काहीसे शिस्त व गंभीर वाटणाऱ्या राजकीय मंचावर आमदार विवेक कोल्हे यांनी माजी खासदार सुजय विखे यांचे आभार मानले. पण ते मानताना त्यांनी “माजी खासदार सुजय विखे यांनी त्याग केला म्हणून आपला नंबर लागला’ हे वक्तव्य उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरले. दरम्यान, सुजय विखे यांनी याआधी एका जाहीर कार्यक्रमात “तुम्हाला मिळालेली पदे ही आम्ही सोडून दिलेली आहेत. सत्कार, स्वार्थासाठी आम्हाला पदाची आम्हाला गरज नाही’, असे विधान केले होते. त्याला ही आ.कोल्हेंची मिश्किल कोपरखळी होती की कायॽ असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
आ. विवेक कोल्हे यांचे वक्तव्य वरकरणी आदराचे आणि आभाराचे वाटत असले, तरी त्यामागील उपरोधिक टोला सुज्ञ कार्यकर्त्यांच्या चांगलाच लक्षात आला. विशेष म्हणजे व्यासपीठावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे व्यासपीठावर असताना हे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. वास्तविक पाहता, कोल्हे आणि विखे यांच्यातील हा कलगीतुरा नवीन नाही. कोल्हे आणि विखे कुटुंबातील राजकीय संघर्ष जिल्ह्यासह राज्याला परिचित आहे. आमदार म्हणून निवड झाल्यानंतर विवेक कोल्हे यांनी पालकमंत्र्यांच्या तालुक्यात विरोधकांकडून सत्कार स्वीकारला होता. यावेळी त्यांनी “मुख्यमंत्र्यांनी आमदारकीचा बिल्ला माझ्या छातीवर लावला आहे, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. विधान परिषद आमदार झाल्याने आपल कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे, त्यात राहाता आणि लोणीही येते,’ असे म्हणत सूचक विधान केले होते. आमदार सत्कार सोहळ्यातील विधानाने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आ. विवेक कोल्हे सुजय विखे
जिल्ह्यासाठी ऐतिहासिक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातून एकाच वेळी चार आमदार विधान परिषदेवर जाणे ही मोठी ऐतिहासिक घटना आहे. या नव्या आमदारांच्या माध्यमातून जिल्ह्याला नवे नेतृत्व मिळाले आहे. जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत काम करून जिल्हा पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आहे. भारतीय जनता पार्टी ही योग्य व्यक्तीला योग्य संधी देणारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. भाजपचे विधान परिषदेचे नूतन सदस्य आमदार सुनील कर्जतकर, आमदार विवेक कोल्हे व आमदार प्राजक्त तनपुरे तसेच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले आमदार अक्षय कर्डिले यांचा सत्कार सोहळ्यावेळी मंंत्री विखे पाटील बोलत होते.