![]()
अहिल्यानगर शहर आणि उपनगरातील बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या हवामानाचा आणि अवकाळी पावसाचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या आवकीवर झाला आहे. परिणामी टोमॅटो, फ्लॉवर, वांगी आणि हायब्रीड लसणाचे भाव कडाडले आहेत. गृहिणींचे बजेट मात्र या दरवाढीमुळे कोलमडले असून, बाजारात फळभाज्यांची खरेदी करताना सर्वसामान्यांना हात आखडता घ्यावा लागत आहे. सर्वाधिक दरवाढ टोमॅटो आणि हायब्रीड लसणाच्या दरात पाहायला मिळत आहे. टोमॅटो ४० रुपयांवरून ६० रुपये किलोवर पोहोचले आहेत, तर हायब्रीड लसूण किलोमागे ३०, तर गावरान लसून किलोमागे ५० रुपयांनी महागला आहे. पालेभाज्यांमध्ये मात्र ग्राहकांना थोडा दिलासा आहे. पालकाची जुडी १० रुपयांवरून पुन्हा २ ० रुपयांवर आली आहे, तर मेथी आणि कोथिंबीरचे दर स्थिर आहेत. कांदा आणि बटाट्याचे दर २५ रुपये किलोवर टिकून असल्याने सर्वसामान्यांच्या ताटातील मूलभूत घटकांना मात्र सध्या तरी महागाईची झळ लागलेली नाही. हवामान पूर्ववत होऊन नवीन आवक जोपर्यंत वाढणार नाही, तोपर्यंत हे भाव तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.केडगाव उपनगर, नालेगाव परिसरात मोठा बाजार भरतो. मुख्य बाजारपेठेत चितळे रोडवरील भाजीपाला बाजार, तर सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, एकविरा चौक व गुलमोहोर रोडवरील पारिजात चौकाजवळ, बालिकाश्रम रोड, तपोवन रोड, तसेच सिव्हिल हडको परिसरात गणेश चौक, आदी ठिकाणी भाजीपाल्याचे दर महागले आहेत. पालक जुडी – २ ० रु, मेथी जुडी – ४० रु, कोथिंबीर जुडी – २० रु, शेपू जुडी – ३५ रु, कोबी – ४० रु, फ्लॉवर – ५० रु, काकडी – ३० रु, कांदा – २५ रु, बटाटा – २५ रु, वांगी – ५० रु, कारले – ५० रु, शेवगा – ८० रु, गावरान लसूण – २०० रु, हायब्रीड लसूण – १५० रु, लिंबू – ४० रु, टोमॅटो – ६० रु. नेहरु मार्केट परिसरात भाजीपाला खरेदी करताना महिला ग्राहक वादळी वाऱ्यामुळे झाले नुकसान गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अचानक वादळी वारे आणि हवामान बदलाचा मोठा फटका शेतीला बसला. शेतात तयार असलेला भाजीपाला खराब झाल्याने आणि तोडणीला उशीर झाल्याने शहराच्या बाजार समितीमध्ये येणारी आवक लक्षणीयरीत्या घटली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त, या गणितामुळे विशेषतः फळभाज्यांचे (टोमॅटो, वांगी, फ्लॉवर) आणि हायब्रीड लसणाचे भाव वधारले आहेत.
Source link
टोमॅटो, लसणासह फळभाज्यांना महागाईची फोडणी:वादळी वाऱ्याचा तडाखा व भाजीपाल्याची आवक घटल्याने बाजारात दरवाढ