राज्यभरात पावसाचा जोर कमालीचा वाढला असून आज (४ जुलै) देखील बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा कडक इशारा देण्यात आला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने धडाकेबाज बॅटिंग सुरू केल्याने बळीराजा सुखावला
.
दुसरीकडे, विदर्भातील गोंदिया, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून, उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण विदर्भात आज आणि उद्या मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या २४ तासांत मुंबईत अनेक ठिकाणी १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असून, अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासनाने “गरज असेल तरच घराबाहेर पडा,” असे आवाहन मुंबईकरांना केले आहे.
एच-पश्चिम वॉर्डमध्ये सर्वाधिक १४६ मिमी पाऊस
गेल्या २४ तासांत मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई महापालिकेच्या पर्जन्यमापन केंद्रानुसार, वांद्रे येथील एच-पश्चिम (H-West) प्रभाग कार्यालयात सर्वाधिक १४६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
इतर भागांतील पावसाची आकडेवारी: वांद्रे येथील सुपारी टाकी शाळा १४३.४ मिमी, पाली शाळा १४०.६ मिमी, जी-दक्षिण प्रभाग १४०.२ मिमी, तर एफ-उत्तर प्रभाग कार्यालयात १३२ मिमी पाऊस झाला आहे.
पूर्व उपनगरेही चिंब: मानखुर्द अग्निशमन केंद्र १२६.८ मिमी, चेंबूरची कलेक्टर कॉलनी १२४.२ मिमी, तर घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये १२०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर; नागरिकांना कडक सूचना
संभाव्य परिस्थिती पाहता मुंबई महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे हाय अलर्टवर आहेत. हवामान खात्याने पुढील काही तासांत मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सखल भाग, समुद्रकिनारे आणि धोकादायक ठिकाणी फिरणे तसेच सेल्फी काढणे पूर्णपणे टाळावे, अशा कडक सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
गोरेगाव उड्डाणपुलावर वाहतूक मात्र सुरळीत
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शनिवारी गोरेगाव उड्डाणपुला परिसराला जोरदार झोडपले. पावसाचा वेग कायम असतानाही गोरेगाव फ्लायओव्हरवरील वाहनांची वाहतूक कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय सुरळीत सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले असून, पुढील काही तासांतही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
महेश्वरी उद्यानात झाड कोसळून पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान
मुंबईतील मुसळधार पावसामुळे महेश्वरी उद्यान परिसरात एक मोठे झाड कोसळून अनेक पार्क केलेल्या वाहनांचे नुकसान झाले. घटनेनंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झाड हटवण्याचे आणि परिसरातील ढिगारा साफ करण्याचे काम सुरू केले. पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी झाडांच्या परिसरात आणि धोकादायक ठिकाणी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई, ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; सातारा-पुण्यातही जोर
हवामान विभागाने ४ ते ७ जुलै दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
रेड अलर्ट कुठे? मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुण्याचा घाटमाथा आणि सातारा या जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
ठाणे आणि सातारा अपडेट: ठाण्यात कालपासून ५८ मिमी पावसाची नोंद झाली असून आज पहाटेपासून धो-धो पाऊस सुरू आहे. तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयनानगर, महाबळेश्वर आणि नवजा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.
हेही वाचा..
गुजरातमध्ये पूर, 19 जणांचे रेस्क्यू: महाराष्ट्रातही सर्वदूर पाऊस, पालघरमध्ये शाळा – कॉलेज बंद; उज्जैनमध्ये युवक वाहून गेला

मान्सून देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये पोहोचला आहे. पण गुजरात – महाराष्ट्राचे काही भाग याला अपवाद आहेत. तत्पूर्वी या दोन्ही राज्यांमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरातच्या मेंडरडा परिसरात समधियाळा गावाजवळ पुराच्या पाण्यात चार गाड्या अडकल्या. त्यात अडकलेल्या 19 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तिकडे महाराष्ट्रातील नालासोपारा येथे रेल्वे स्टेशनबाहेर गुडघ्यापर्यंत पाणी साचले. प्रवाशांना पाण्यातून वाट काढत स्टेशनवर पोहोचावे लागत आहे. पालघरमध्ये पावसामुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. सविस्तर वाचा
पर्यटकांची प्रतीक्षा संपली: लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हरफ्लो; पायऱ्यांवरून वाहू लागले शुभ्र पाण्याचे प्रवाह

पर्यटकांचे हक्काचे ठिकाण आणि पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या लोणावळ्यातील प्रसिद्ध ‘भुशी धरण’ आज सकाळी अखेर ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४८ तासांत लोणावळा-खंडाळा परिसरात झालेल्या तब्बल २२९ मिमी मुसळधार पावसामुळे धरणाचा सांडवा पूर्णपणे भरून वाहू लागला आहे. शुभ्र फेसाळणारे पाण्याचे प्रवाह पायऱ्यांवरून वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे उधाण आले असून, लोणावळ्यातील वर्षा पर्यटनाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.
मुंब्र्यात हृदयद्रावक घटना:साचलेल्या पाण्यात करंट उतरल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू; प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांचा संताप

मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेनंतर आता मुंब्र्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरल्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण मुंब्रा परिसर हादरून गेला असून, प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा