![]()
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामाच्या संथ गतीचा फटका शनिवारी (दि. ४) निफाडकरांना बसला. शांतीनगर चौफुली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे प्रवाशांसह नागरिकांना तीन तास कांेडीचा सामना करावा लागला. प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. निफाड शहरातून जाणाऱ्या नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्ग तसेच सुरत-शिर्डी महामार्गावर दिवसभर वाहनांची मोठी गर्दी होती. शांतीनगर चौफुली परिसरात वाहतुकीचा ताण वाढल्याने वाहनचालकांना बराच वेळ खोळंबून राहावे लागले. सध्या नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गाचे काम सुरू असून ते अत्यंत संथ गतीने होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने निर्माण होत आहे. शनिवारी ही समस्या अधिक तीव्र झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या मार्गावर शाळा, न्यायालय, बँका, नगरपंचायत, पंचायत समिती, विविध शासकीय कार्यालये तसेच बाजार समिती असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. त्यातच सुरू असलेल्या रस्ते कामामुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. कोंडीमुळे पोलिस प्रशासनावरही अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. त्वरित उपाययोजना करण्याची मागणी महामार्गाचे काम याच संथ गतीने सुरू राहिले तर निफाड चौफुलीवरील वाहतूक कोंडी ही रोजचीच समस्या बनेल. नागरिकांना रुग्णालय, शाळा, कार्यालये, सामाजिक कार्यक्रम तसेच इतर कामांसाठी वेळेत पोहोचणे कठीण होईल. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. – विजय धारराव, रहिवासी,
Source link
महामार्गाच्या संथ कामामुळे निफाडला 3 तास कोंडी:दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; नागरिकांमध्ये संताप,