![]()
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यात ‘इमर्जन्सी’ जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे, सरकारने जनतेला सांगावं’ सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि मिसिंग लिंकसह अनेक महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. आळंदीमध्ये पूरस्थिती आहे, रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत आणि रस्ते खचल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी. मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्नचिन्ह मिसिंग लिंक प्रकल्पाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, या प्रकल्पाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते आणि सर्वांनी त्याचे स्वागतही केले होते. मात्र, आता या प्रकल्पाशी संबंधित समोर येणारे व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहेत. या प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला, पण त्यातून अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. या प्रकल्पाचे सेफ्टी ऑडिट झाले होते का? नैसर्गिक आपत्तीचा विचार करून नियोजन करण्यात आले होते का? याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांची पारदर्शक चौकशी करा’ राज्यात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, वसई-विरार, भांडूप, मुंबई आणि इतर भागांत अनेक प्रकल्प सुरू आहेत. मात्र, सुरक्षितता आणि पर्यावरणाचा पुरेसा विचार झालेला दिसत नाही. या सर्व प्रकल्पांवर किती खर्च झाला, सुरक्षा तपासणी झाली का आणि नियोजनात नैसर्गिक आपत्तींचा विचार करण्यात आला होता का, याची पारदर्शक चौकशी व्हावी, अशी त्यांनी मागणी केली. ‘एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाला’ सुळे म्हणाल्या की, राज्यातील अनेक महत्त्वाचे मार्ग बंद आहेत. ताम्हिणी घाट, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि मिसिंग लिंक या तिन्ही मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या दोन प्रमुख शहरांतील संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या म्हणाल्या, “एकाच पावसाने संपूर्ण महाराष्ट्र पॅरालाइज झाल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत एखादा रुग्ण, डॉक्टर, विद्यार्थी किंवा अत्यावश्यक कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे काय, याचाही विचार सरकारने करायला हवा.” मानखुर्द दुर्घटना आणि झाडे पडण्याच्या घटनांवर सवाल मानखुर्दमध्ये चाळ कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रशासनाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित केला. मुंबईत शाळेच्या बसवर झाड पडणे, अनेक भागांत झाडे कोसळणे आणि रस्त्यांवर भगदाड पडणे या घटनांकडे लक्ष वेधत त्यांनी विचारले की, धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि आवश्यक उपाययोजना वेळेत का करण्यात आल्या नाहीत? मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचे प्रशासनाला आवाहन ‘सरकारकडे विरोधकांसाठी वेळ आहे, जनतेसाठी नाही’ सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या की, सत्ताधारी नेते सतत विरोधकांवर कारवाई करण्यात व्यस्त आहेत. मात्र, सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. राम मंदिरातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा संसदेत मांडणार पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्या आणि उज्जैन येथील कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या वृत्तांचाही उल्लेख केला. प्रभू श्रीराम हे देशाच्या श्रद्धेचे केंद्र असून अशा ठिकाणी भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. हा मुद्दा आगामी संसदेच्या अधिवेशनात इंडिया आघाडी ताकदीने मांडेल, तसेच या विषयावर आघाडीच्या बैठकीतही चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चांवर स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गेली 27 वर्षे विश्वासाने एकत्र काम केले आहे आणि भविष्यातही सहकार्य कायम राहील. मात्र, पक्षाच्या विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चा केवळ माध्यमांपुरत्याच असून, पक्षांतर्गत अशा कोणत्याही चर्चेला दुजोरा देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Source link
एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाला!:सुप्रिया सुळे यांची कडाडून टीका, मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यात इमर्जन्सी जाहीर करण्याची मागणी