Headlines

राज्यात अतिवृष्टीने 9 बळी:मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 5 चिमुकल्यांसह 6 जणांचा अंत; पावसामुळे जनजीवन विस्कळीत




मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत घरांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आल्याचे चित्र पाहायला मिळत असून, याचा मोठा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे. या संततधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन तर विस्कळीत झालेच आहे, पण त्याचबरोबर राज्याच्या विविध भागांत काही गंभीर दुर्घटनाही घडल्या आहेत. या अतिवृष्टीमुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत तब्बल 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला असून, 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी 8 जणांचा मृत्यू भिंत कोसळल्यामुळे, तर एकाचा मृत्यू झाड अंगावर पडल्याने झाला आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, मुंबई उपनगरात भिंत पडून 6 जण आणि झाड पडून 1 जण अशा एकूण 7 जणांनी आपला जीव गमावला आहे. याशिवाय, पुणे आणि ठाणे येथेही भिंत पडण्याच्या दुर्घटनेत प्रत्येकी एका नागरिकाचा बळी गेला आहे. वाढत्या दुर्घटना पाहता, नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. मानखुर्द परिसरात तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू मुंबईतील मानखुर्द परिसरात एक तीन मजली धोकादायक चाळ रिकामी करत असताना पावसाच्या तडाख्याने चाळीचा काही भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव घरातील सामान आवरत असतानाच अचानक घर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली दबून पाच निष्पाप लहान मुलांसह एका महिलेचा (असे एकूण 6 जणांचा) जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत मानखुर्द पोलिसांनी गु. र. क्र. 425/2026 अन्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पालघरमध्ये मुसळधार पाऊस पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाले ओसंडून वाहत असून, गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील वैतरणा, तानसा, सूर्या, देहेरजा आणि पिंजाळ या प्रमुख नद्यांना मोठा पूर आला आहे. यामध्ये तानसा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, वैतरणा नदीही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. वैतरणा नदीला आलेल्या या भीषण पुराचे पाणी आता थेट नदीकाठच्या गावांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना अत्यंत सतर्क राहण्याचा इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. इंद्रायणी नदीला पूर आळंदीत आज सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून मंदिर परिसरातही पाणी साचले आहे. मात्र सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला असून रिमझिम पाऊस सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे उद्या आणि परवा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार असल्याने आळंदीत हजारो वारकरी दाखल झाले आहेत. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने वारकऱ्यांना सुरक्षिततेसाठी कोणत्याही परिस्थितीत इंद्रायणी नदीपात्रात किंवा घाट परिसरात न जाण्याचे सक्त आवाहन केले आहे. याशिवाय, पावसाची सध्याची स्थिती लक्षात घेऊन आळंदी आणि देहूकडे नव्याने निघालेल्या वारकऱ्यांनी तिथे न येता थेट पुण्यातूनच वारीमध्ये सहभागी व्हावे, असे अत्यंत महत्त्वाचे आवाहन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *