![]()
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर अॅक्शन मोडमध्ये दिसून आले आहेत. निंबाळकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र भेट घेऊन धाराशिव लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि जनहिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतकरी, सिंचन, पाणी, वीज, उद्योग, रोजगार आणि तुळजाभवानी मंदिरातील भाविकांच्या सुविधांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांशी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताना निंबाळकर यांनी कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी केली. तसेच ७ टीएमसी पाणी योजनेसाठी भरीव निधी देऊन कामे वेगाने पूर्ण करावीत, अशीही विनंती त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. पिकविमा योजनेतून वगळण्यात आलेले ट्रिगर पुन्हा लागू करून विमा कंपनीच्या निकषांमध्ये आवश्यक बदल करावेत, तसेच शेतजमीन खरवडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रलंबित आर्थिक मदत तातडीने वितरित करावी, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय वैराग येथे महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू करणे, मांजरा आणि तेरणा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जलसाठा वाढविणे, तसेच कौडगाव एमआयडीसीमध्ये लॉजिस्टिक पार्क उभारून औद्योगिक विकासाला चालना देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. एकनाथ शिंदेंकडे स्किल डेव्हलपमेंट सेंटरची मागणी यानंतर निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडलेल्या बहुतांश मागण्या पुन्हा मांडत धाराशिवमध्ये आधुनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्याची अतिरिक्त मागणी केली. टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सीएसआर निधी आणि राज्य सरकारच्या सहकार्याने धाराशिवमध्ये आधुनिक कौशल्य विकास केंद्र उभारावे, जेणेकरून स्थानिक युवक-युवतींना उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी मागणी त्यांनी शिंदेंकडे केली. तुळजाभवानी मंदिरातील सुविधांवरही चर्चा दोन्ही नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजारी आणि मंदिर प्रशासन यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करून राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ, सुरळीत आणि जलद दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही सविस्तर चर्चा झाल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. जनहिताचे प्रश्न मार्गी लावण्याची विनंती धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, तसेच प्रलंबित विकासकामांना गती मिळावी यासाठी राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. शिवसेनेत प्रवेशानंतर ओमराजे निंबाळकर यांनी राज्यातील दोन्ही प्रमुख नेत्यांची भेट घेत धाराशिवच्या विकासकामांसाठी पाठपुरावा सुरू केल्याने त्यांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. हे ही वाचा… मोशी कचरा डेपो दुर्घटना:आई-वडील गावात पापड विकायचे; मुलाने पुण्यात सुखाचा संसार थाटला, पण मोशीतील दुर्घटनेने सर्व काही संपवले मोशी येथील कचरा डेपोच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एका उच्चशिक्षित तरुण कर्मचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. भावेश मोहन वाणी (वय ३३ वर्षे) असे या मृत तरुणाचे नाव आहे. भावेश हे रुपीनगर (निगडी) येथे राहत असून, ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावचे रहिवासी होते. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने वाणी कुटुंबाचा एकमेव आधार हरपला असून, शुक्रवारी (दि. १० जुलै) रुपीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सविस्तर वाचा…
Source link
शिवसेना प्रवेशानंतर ओमराजे निंबाळकर अॅक्शन मोडमध्ये:फडणवीस-शिंदेंची भेट घेत धाराशिवसाठी मांडल्या मोठ्या मागण्या