![]()
पैठण आषाढी वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नव्हे, तर संतांच्या विचारांचा आणि भक्तीचा अखंड उत्सव आहे. संत एकनाथ महाराजांची कर्मभूमी असलेल्या पैठणची ही अध्यात्मिक परंपरा यंदाही आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या पालखी सोहळ्यात अनुभवायला मिळत आहे. या पालखी सोहळ्यात नाथ महाराजांच्या भारुडांनी वारकऱ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले आहे. संत एकनाथ महाराजांचे भारुड हे केवळ मनोरंजन नसून समाजाला योग्य दिशा देणारे जीवन तत्त्वज्ञान आहे. म्हणूनच आजच्या पिढीतील युवक-युवतीही या भारुडांकडे आकर्षित होत असून, दिंडीत महिला आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग वाढला असल्याचे पालखी प्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी सांगितले. संत एकनाथ महाराजांनी भारुडाच्या माध्यमातून दिलेले समाजप्रबोधन, समता आणि भक्तीचा संदेश आजही वारकऱ्यांच्या हृदयात जिवंत असल्याचे चित्र आहे. ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, हा सोहळा संतपरंपरेचे वैभव अधोरेखित करत आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात भारुडाची रंगली मैफल विंचू चावला, वृश्चिक चावला…, अगा बाई अरेच्चा यांसारख्या प्रसिद्ध भारुडांच्या ओळींवर वारकरी टाळ-मृदंगाच्या संगतीने तल्लीन होऊन नाचत आहेत. पालखी प्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा सध्या बीड जिल्ह्यातील शिरूरमध्ये विसावला आहे. दिंडीतील चोपदार लक्ष्मणराव रिटे आणि चोपदार कापसे यांनी आपल्या सादरीकरणातून संत एकनाथ महाराजांच्या भारुडांचा रंग भरला . दिंडीतील चोपदार लक्ष्मणराव रिटे आणि चोपदार कापसे भारुडाचे सादरीकरण करताना.
Source link
माउलींच्या पालखीत नाथांच्याभारुडाची भक्तिरसपूर्ण मैफल:युवक-युवतीही भारुडांकडे आकर्षित, दिंडीत उत्स्फूर्त सहभाग