![]()
राजधानी दिल्लीत सोनम वांगचुक तसेच अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात नीट पेपरफुटी प्रकरणी मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातून देखील विरोधी पक्षांकडून तसेच विविध विद्यार्थी संघटनांकडून पाठिंबा दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत ही सगळी नौटंकी असल्याची टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, असे आंदोलन पेटवण्याचे काम कधीच नाही केले. एक विचार असा आहे जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॅमेज करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांना डॅमेज करण्यासाठी असा समाजात एक गट निर्माण झाला आहे. या गटाला दिवसभर काम करायचे आहे. त्यामुळे कॉकरोच वगैरे आंदोलन सगळी नौटंकी आहे. काही मुद्दे मिळत नाही म्हणून लोकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचे काम सुरू आहे. काही मुलांना मनस्ताप झाला आहे म्हणून देखील ते तिथे सहभागी झाले आहेत. याचा अर्थ असा नाही की सरकारने यावर काही कारवाई केली नाही. आमच्या मंत्र्यांनी पेपर लीक केला आहे का? चंद्रशेखर बावनकुळे किंवा धर्मेंद्र प्रधानजींनी पेपर लीक केला आहे का? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. मंत्र्यांचा राजीनामा मागून राजकारण सुरू पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सिस्टममध्ये कोणीतरी बदमाशी केली आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. सरकारने योग्य आणि कडक कारवाई केली आहे. तसेच सरकारने पुन्हा एकदा नीट परीक्षा घेतली आहे. तुम्ही सुधारणा सुचवायला पाहिजे, पण या पद्धतीने, जेव्हा सरकारने आधीच कारवाई केली आहे आणि तरी तुम्ही मंत्र्यांचा राजीनामा मागून या ठिकाणी राजकारण करत आहात, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली तेव्हा ठाकरेंचा राजीनामा मागितला का? उद्धव ठाकरे यांनी अयोध्या राम मंदिरात जो प्रकार घडला त्यावरून संघावर टीका केली होती. यावर प्रश्न विचारला असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अनेक मंदिरांमध्ये कधी कधी चोरी होते. आता मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जेव्हा चोरी झाली तेव्हा कोणाचा अध्यक्ष होता? उद्धव ठाकरेंचा अध्यक्ष होता. मग तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला का आम्ही? अयोध्या राम मंदिरात चोरी झाली, त्यावर लोकांना पकडले जात आहे. कडक कारवाई केली जात आहे. एखाद्या मंदिराच्या कर्मचाऱ्याने चोरी केली आणि तुम्ही अध्यक्षांचा राजीनामा मागत आहात, नीट पेपरफुटी प्रकरणी मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत, हे जे राजकारण चालू आहे, उद्धव ठाकरेंची नौटंकी आहे. अयोध्येत उद्धव ठाकरेंना आमंत्रण असूनही आले नाहीत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरात आमंत्रण देण्यात आले होते. मात्र तेव्हा मतांच्या लांगूलचालनासाठी ते तिथे आले नाहीत. महाराष्ट्रात काही मते कमी होतील म्हणून ते आले नाहीत. तुम्ही भगवान रामचंद्रांचा आयुष्यभर तिरस्कार केला आणि आता तुम्ही असे आंदोलन करून काहीही मिळणार नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
Source link
'नीट पेपरफुटीचे आंदोलन म्हणजे निव्वळ नौटंकी!':मोदी-फडणवीसांना 'डॅमेज' करण्याचा विरोधकांचा कट, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका