![]()
रस्त्यावरील अपघातांचे वाढते प्रमाण आणि त्यामध्ये जाणाऱ्या निरपराध नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी अमरावती शहर पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे. शुक्रवारपासून (दि. २४) शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दुचाकी चालक आणि त्यांच्या मागे बसणाऱ्या (पिलियन रायडर) हेल्मेटचा वापर करणे कायदेशीररित्या अनिवार्य करण्यात आले आहे. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या चालकांचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये अमरावती शहर हद्दीत एकूण ४५४ अपघात झाले होते. २०२५ मध्ये ४१७ अपघात नोंदवले गेले, तर चालू वर्षात म्हणजेच १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत २१० अपघातांची नोंद झाली आहे. एकूण प्राणांतिक अपघातांपैकी तब्बल ६० टक्के अपघात हे मोटरसायकल चालकांचे होतात. दुचाकी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या बहुतांश वाहनधारकांचा मृत्यू हा डोक्यात हेल्मेट नसल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने होतो. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता दुचाकी चालक आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.ही अंमलबजावणी पोलिस आयुक्तालयातील सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ग्रामीण तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर एकाच वेळी सुरू होणार आहे. वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाईसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्यापूर्वी पोलिस प्रशासनाकडून शहरात व्यापक जनजागृती करण्यात आली. पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांकडून जनजागृती करण्यात आली आहे. हेल्मेट हा केवळ पोलिसांच्या दंडापासून वाचण्याचा मार्ग नसून आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेचे कवच आहे. सुरक्षित प्रवास, सुरक्षित परिवार या ध्येयाने अमरावतीच्या सर्व दुचाकीस्वारांनी स्वयंस्फुर्तीने हेल्मेटचा वापर करावा. स्वसुरक्षेसाठी हेल्मेट आवश्यक; राकेश ओला
Source link
शहरात आजपासून हेल्मेटची सक्ती कडक:दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही आता अनिवार्य : खरेदीसाठी वाहनधारकांची लगबग