![]()
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणाची अनुभूती देणारा बालदिंडी सोहळा कर्जत तालुक्यातील सटवायवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. या बालदिंडीद्वारे विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि पर्यावरण’ संवर्धनाचा संदेश दिला. दिंडी सोहळ्यात शिक्षक आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक टाळ-मृदंगाचा गजर, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण सटवायवाडी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल आणि माता रखुमाई यांच्या सुंदर वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. टाळ-मृदंगाच्या तालावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी एकत्रितपणे पावले खेळल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी काढलेली ‘वृक्षदिंडी’. भक्तीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘एक विद्यार्थी – एक झाड’, ‘सुंदर शाळा, गावचा अभिमान’ यासह शिक्षणावर संुदर ते ध्यान माझे शाळेवरी, शिकाल, तर टिकाल, मुलगी शिकली, प्रगती झाली, माता असेल शिक्षित, तर कुटुंब असेल सुरक्षित, अशा विविध जनजागृतीपर घोषवाक्यांचे फलक हातात धरून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.‘वृक्ष लावू अंगणी, हरिनाम घेऊ मुखी, विठ्ठलाच्या नामात रंगू, हिरवी करू धरती सुखी!’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची समृद्ध वारकरी परंपरा, संत साहित्य आणि भक्ती संस्कृतीसोबतच पर्यावरण संवर्धन व सामूहिक सहभागाचे संस्कार लाभले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ व पालकांनी सहकार्य केले. या दिंडी सोहळ्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व पालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक विक्रम अडसूळ आणि सहशिक्षक मच्छिंद्र फरांडे यांनी आभार मानले.
Source link
बालदिंडीतून शिक्षण, पर्यावरण संवर्धनाचा संदेश:सटवायवाडी जि.प. शाळेचा उपक्रम, वारकरी वेशभूषेत चिमुकल्यांचा हरिनामाचा गजर