छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडमध्ये शेतकऱ्यांवर 2 लाख 6 हजारांचे कर्ज आहे ते कर्जमुक्तीच्या यादीत सव्वा लाख रुपयेच दाखवल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. उरलेले कर्ज बँक भरणार का? अनेक शेतकऱ्यांसोबत हेच होत आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे. तर
.

अंबादास दानवे यांनी कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील शेतकरी लक्ष्मीकांत खरे यांचे उदाहरण देत सरकारने याचे उत्तर द्यावे असे म्हटले आहे. शेतकरी लक्ष्मीकांत खरे यांच्यावर 2 लाख 6 हजार 602 रुपये इतके कर्ज असताना, सरकारच्या कर्जमुक्तीच्या यादीत मात्र 1 लाख 20 हजार 561 रुपये एवढीच रक्कम दाखवण्यात आली आहे. उरलेली उर्वरित रक्कम कोण भरणार? याचे स्पष्ट उत्तर सरकारने दिले पाहिजे. यातील उरलेली रक्कम बँकांनी भरायची आहे, असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करू नये, असा घणाघात दानवे यांनी केला.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत केवळ एकाच शेतकऱ्याबाबत असा प्रकार घडलेला नसून, संपूर्ण राज्यात अशी अनेक उदाहरणे समोर येत असल्याचे दानवे म्हणाले. सरकारच्या या अपुऱ्या आणि त्रुटीयुक्त कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांना पूर्ण दिलासा मिळालेला नाही. कर्जमुक्तीचे मोठे मोठे फलक लावून श्रेय लाटणारे मुख्यमंत्री आता या राहिलेल्या कर्जाची जबाबदारी घेणार का, असा रोखठोक सवाल उपस्थित करत दानवे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले आहेत.

मंजूर रक्कम कमी दिसताच बँकांमध्ये चौकशीसाठी गर्दी, दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जालना जिल्ह्यासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्ष यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण कर्जापेक्षा कमी रक्कम मंजूर झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे नेमकी कर्जमाफी कशी होणार, उर्वरित रकमेचे काय होणार, पुढील प्रक्रिया काय असेल, याबाबत शेतकऱ्यांमध्ये विविध शंका निर्माण झाल्या आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की त्यांच्या नावावर सुमारे एक लाख 90 हजार रुपयांचे पीककर्ज असताना कर्जमाफीच्या यादीत केवळ 70 हजार रुपये मंजूर झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम पुढील टप्प्यात मंजूर होणार का, हीच अंतिम रक्कम आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात शासनाकडून कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन न मिळाल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
यासोबतच कर्जमाफीच्या प्रक्रियेसाठी ई-केवायसी करणे आवश्यक असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ई-केवायसी केल्यानंतर कमी रक्कमच अंतिम मानली जाईल, असा गैरसमज काही शेतकऱ्यांमध्ये पसरला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ई-केवायसी करण्याबाबतही साशंक आहेत. या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मात्र, अनेक बँक कर्मचाऱ्यांनाही शासनाकडून अद्याप सविस्तर सूचना प्राप्त झालेल्या नसल्याने ते शेतकऱ्यांना ठोस माहिती देऊ शकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. शासनाने तातडीने अधिकृत मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्यात, अशी मागणी होत आहे.
याबाबत एसबीआय वडीगोद्री शाखेचे व्यवस्थापक रोहित काळगे म्हणाले, “शेतकरी मोठ्या संख्येने बँकेत येऊन चौकशी करत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कर्जापेक्षा कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम दिसत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या संदर्भात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. कर्जमाफीच्या पहिल्या यादीमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने मंजूर रक्कमेचे निकष, उर्वरित कर्जाची प्रक्रिया, ई-केवायसीबाबत स्पष्ट व अधिकृत माहिती तातडीने जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
हे ही वृत्त वाचा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा:पहिल्या टप्प्यात 13,600 कोटींची कर्जमाफी, दुसरी यादी ऑगस्टमध्ये; नाव नसल्यास तक्रारीचे आवाहन

राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिली लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल 13 हजार 600 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येणार असून दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. अशी माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली आहे. वाचा सविस्तर
हेही वाचा..
कर्जमाफीची दुसरी यादी लवकरच: काळजी न करण्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’बाबत शेतकऱ्यांना मोठी आनंदवार्ता दिली असून, ही संपूर्ण योजना एकूण तीन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. यापूर्वी 22 जुलै रोजी अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने 533 पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या दुसऱ्या यादीतील लाभार्थ्यांचा आकडाही समोर आला आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या काही अटी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे. सविस्तर वाचा