![]()
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल 20 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. ‘ईडीच्या भीतीमुळे नाही, तर सरकारच्या शिष्टमंडळामुळे जरांगे यांनी उपोषण मागे घेतले,’ असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला होता. यावर जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी जोरदार पलटवार केला आहे. पाटोद्यामध्ये ईडीची भीती वाटल्यामुळेच जरांगे तिथे थांबले आणि ‘माझ्यासह 80 जणांना ईडी उचलणार होती,’ असे विधान काळकुटे यांनी केले होते, याची आठवण करून देत खुणे यांनी टीका केली की, याच भीतीमुळे हे लोक अंधारात सरकारच्या शिष्टमंडळाच्या पाया पडले. तसेच, अमोल खुणे यांनी मंत्री उदय सामंत यांना थेट सवाल करत विचारले की, 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा शिष्टमंडळ केवळ 15 दिवसांचा वेळ मागत होते. त्यावेळी ‘एक मिनिटही देणार नाही’ असे ठणकावून सांगणाऱ्या जरांगे यांनी आता सरकारच्या शिष्टमंडळाला थेट तीन महिन्यांचा वेळ कसा काय दिला? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मंत्री उदय सामंत यांनी अशी ‘डबल ढोलकी’ वाजवू नये, असा सणसणीत टोलाही खुणे यांनी लगावला आहे. अमोल खुणे म्हणाले, शिष्टमंडळाने काहीच दिले नाही. पाटोद्यातून हे पुढे सरकले असते तर गंगाधर काळकुटे आणि श्रीराम कुरुंदकरला ईडी उचलणार होती. गंगाधर काळकुटेनी माझा कार्यक्रम लागला म्हणून सगळ्यांना फोन केले होते. गेवराई पर्यंत साधारण होता, गेवराईनंतर तंबाखूच्या पिचकारी मारल्या, गाड्या बाजूला काढण्यासाठी शिव्याही दिल्या, ही एनर्जी कुठून येती? पब्लिक समोरच नाटकं केले धरायला चार जण असायचे, मराठ्यांचा इतिहास आहे, एवढ्या लढाया झाल्या, युद्ध झाले, एक तरी मावळा कुठल्या मोहिमेवर रडत गेला का? हा प्रत्येक लढाईला रडत जातो. खिंड लढवायला हा बाजीप्रभू लागून गेला का? हे नाटक कुठेतरी थांबलं पाहिजे. पुढे बोलताना अमोल खुणे म्हणाले, मी एवढं बोलतोय, सर्वच टीमवर, मनोज जरांगेवर. हे का माझ्यावर बोलत नाहीत? यांच्यात धमक नाही. मनोज जरांगे जर खरे असतील, तर मनोज जरांगेने माझ्यासमोर बसावं आता समोरासमोर बोलावं. मग मी सांगतो मनोज जरांगेने काय केलंय आणि मनोज जरांगेने सांगावं आता अमोलने काय केलंय. मी जर कुठे चुकीचा ठरलो, तर मला समाज जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे आणि मनोज जरांगे जर चुकीचा ठरला, तर समाजाने जी शिक्षा दिली ती मनोज जरांगेने स्वीकार करावी, असे खुणे यांनी थेट म्हटले आहे. ही देखील बातमी वाचा.. खोटे आरोप सिद्ध करा, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकू:मनोज जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटेंचा बारस्कर यांना इशारा आपल्यातच वाद होऊ नये आणि मराठा समाजात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून मी आजवर अजय बारस्कर आणि अमोल खुने यांच्यावर बोलणे टाळले होते. मात्र, आता त्यांनी पुराव्यांनिशीच बोलावे, अन्यथा त्यांना हे महागात पडेल आणि वेळप्रसंगी आम्ही त्यांना कोर्टातही खेचू, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिला आहे. तसेच, जरांगे पाटील यांच्या घातपात प्रकरणात मी तक्रार दिल्यामुळेच तो अडकला, असा अमोल खुने याचा समज झाल्याने त्याचा माझ्यावर राग असल्याचेही काळकुटे यांनी पुढे स्पष्ट केले. वाचा सविस्तर
Source link
'ED च्या भीतीनेच अंधारात शिष्टमंडळाच्या पाया पडले':अमोल खुनेंचा मनोज जरांगेंवर गंभीर आरोप; उदय सामंतांना 'डबल ढोलकी' न वाजवण्याचा टोला