![]()
“वारी ही केवळ पायी चालण्याची यात्रा नाही, तर मनातील अहंकार, मत्सर, लोभ आणि द्वेष दूर करून आत्मशुद्धी साधण्याचा मार्ग आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि वारकरी संतांनी दिलेला समता, प्रेम, सेवा आणि नामस्मरणाचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा आहे. विठ्ठलभक्ती ही माणसाला माणुसकी शिकवते. वारीत प्रत्येक वारकरी हा समान असतो. जात, पात, श्रीमंती-गरीबी यापलीकडे जाऊन सर्वजण विठ्ठलाच्या चरणी एकरूप होतात, हाच वारकरी संप्रदायाचा खरा संदेश आहे, असे प्रतिपादन हभप उद्धव महाराज मंडलीक यांनी केले. श्री क्षेत्र देवळाली प्रवरा ते तीर्थक्षेत्र पंढरपूर श्री त्र्यंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळ्याची गुरुवारी देवळाली प्रवरा येथे भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यानिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनात महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी वारकरी संप्रदायाचे महत्त्व, वारीचे आध्यात्मिक स्वरूप आणि संतांच्या विचारांची आजच्या काळातील आवश्यकता यावर प्रभावी निरूपण केले. यावेळी सोन्याबापू जाधव यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले. सहारा लॉन्स येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते.
Source link
पंढरीची वारी हा आत्मशुद्धी साधण्याचा खरा मार्ग:हभप उद्धव महाराज मंडलिक यांचे प्रतिपादन, भाविकांची उपस्थिती