“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी गर्जना लोकमान्य टिळकांनी केली होती. जर ते आज हयात असते, तर त्यांनी ‘भारताला सशक्त आणि विकसित बनवणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी ते करूनच राहीन’, असा नवा नारा दिला असता,” असे प्रतिपादन भारताचे
.
पुण्यात लोकमान्य टिळकांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित डोभाल यांना प्रतिष्ठेचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराला उत्तर देताना डोभाल यांनी देशहित, लोकमान्य टिळकांचे विचार आणि आपल्या बालपणीच्या पुण्याच्या आठवणींना उजाळा दिला.
टिळक हे शौर्य, समाजसुधारणा आणि तत्त्वज्ञानाचा त्रिवेणी संगम
लोकमान्य टिळकांच्या योगदानाला उजाळा देताना डोभाल म्हणाले, “ज्या काळात ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवण्याची कोणाची हिंमत नव्हती, तेव्हा टिळकांनी देशाला लढण्याचे आणि जिंकण्याचे धाडस दिले. त्यांनी तरुणांमध्ये नवी चेतना निर्माण केली.”
“पुण्यात प्लेगची साथ आली असताना त्यांच्या 21 वर्षीय मुलाचे (विश्वनाथ) निधन झाले, तरीही त्यांनी पुणे सोडले नाही आणि ते लोकांची सेवा करत राहिले. पुण्याची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या शूरवीरांची आणि गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर यांच्यासारख्या विचारवंतांची आहे. टिळकांच्या व्यक्तिमत्त्वात शौर्य, समाजसुधारणा आणि तत्त्वज्ञान (गीता रहस्य) यांचा अद्भुत त्रिवेणी संगम पाहायला मिळतो.
बालपणीच्या पुण्याच्या आठवणी
डोभाल यांनी आपल्या बालपणीच्या पुण्याच्या आठवणी सांगताना सर्वांची मने जिंकली. “76 वर्षांपूर्वी, मी केवळ 5 वर्षांचा असताना माझे वडील लष्करात असल्याने आम्ही पुण्यात राहायला आलो होतो. माझी आई मला दर मंगळवारी चतुःशृंगी देवीच्या मंदिरात घेऊन जायची, तिथे मिळणारा गोड रोट (प्रसाद) मला आजही आठवतो.”
“पुण्यातच मी माझ्या शालेय शिक्षणाला सुरुवात केली. शाळेत परिपाठाच्या वेळी एका शिक्षकांनी लोकमान्य टिळकांवर 10 मिनिटांचे भाषण दिले होते. टिळकांच्या जीवनाशी माझा तो पहिला परिचय होता. 76 वर्षांनंतर त्याच टिळकांच्या नावाचा पुरस्कार घेण्यासाठी मी इथे उभा राहीन, याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.”
राष्ट्रहित सर्वोच्च
देशहिताबाबत बोलताना त्यांनी व्यवस्थापनातील ‘VED Analysis’ (Vital, Essential, Desirable) चा दाखला दिला. “आपल्या आयुष्यात राष्ट्रसेवा आणि देशाला शक्तिशाली बनवणे हे ‘Vital’ (अत्यंत महत्त्वाचे) असले पाहिजे. या सर्वोच्च ध्येयासमोर आपल्या बाकीच्या सर्व वैयक्तिक, जातीय किंवा प्रादेशिक इच्छा-आकांक्षा दुय्यम ठरल्या पाहिजेत. एखादी गोष्ट जर राष्ट्राच्या हिताची नसेल, तर ती माझ्याही हिताची नाही, हा विचार तरुणांनी अंगीकारला पाहिजे.”
अंतर्गत आणि बाह्य आव्हाने
सध्याच्या देशासमोरील आव्हानांवर आणि नेतृत्वावर त्यांनी भाष्य केले. “भारत अजूनही आपल्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेला नाही. देशाला आजही अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करावा लागत आहे. भारताचा विकास अनेक देशांना आणि शक्तींना खुपत आहे, त्यांचा आपल्याला खंबीरपणे मुकाबला करायचा आहे.”
“देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखे खंबीर नेतृत्व लाभले आहे. अमित शहा यांच्यासोबत काम करताना मी त्यांची देशाप्रति असलेली कटिबद्धता आणि स्पष्ट दृष्टिकोन जवळून पाहिला आहे.”
भाषणाच्या शेवटी अजित डोभाल यांनी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या ‘आग की भीख’ या कवितेच्या ओळी ऐकवत तरुणांना राष्ट्रनिर्माणासाठी आणि देशाला शक्तिशाली बनवण्यासाठी स्वतःला झोकून देण्याचे आवाहन केले.
हेही वाचा…
गृहमंत्री अमित शहांचा पुणे दौरा:NSA अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; सुरक्षेच्या इतिहासात डोवाल यांच्या नावे ‘सुवर्ण पान’ राखीव- शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज (शनिवार, 1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सर्वप्रथम सारसबाग येथील स्मारकाला भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. त्यानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. येथे वाचा संपूर्ण बातमी