![]()
“आमदार अमोल मिटकरी यांनी रायगड जिल्ह्याच्या राजकारणात नाक न खुपसता सध्या स्वतःच्याच पक्षात त्यांचे जे खच्चीकरण सुरू आहे, त्याकडे लक्ष द्यावे. तर आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील जहरी टीका तत्काळ थांबवावी. शिंदे साहेबांनी जर उठाव केला नसता, तर आज नाईक साहेब मंत्रीही झाले नसते,” असे खडेबोल सुनावत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विरोधकांवर आणि महायुतीतील नेत्यांवर पलटवार केला आहे. अकोले येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर योगेश कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अमोल मिटकरींना टोला भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदावरून आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना कदम म्हणाले, “सक्षम नेत्यालाच पालकमंत्री पद मिळेल असे अमोल मिटकरी म्हणतात, याचा अर्थ भरतशेठ गोगावले सक्षम नाहीत असे त्यांना म्हणायचे आहे का? अमोल मिटकरींचा रायगड जिल्ह्याशी काडीचाही संबंध नाही. सध्या त्यांच्याच पक्षामध्ये (राष्ट्रवादी काँग्रेस) त्यांचे कसे खच्चीकरण केले जात आहे, यावर त्यांनी आत्मपरीक्षण केले तर ते त्यांच्यासाठी जास्त फायद्याचे ठरेल.” गणेश नाईकांना इशारा भाजप नेते गणेश नाईक यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘बिल्डरांच्या नादी लागल्याची’ टीका केली होती. यावर संताप व्यक्त करत कदम म्हणाले, “गणेश नाईक साहेबांनी आता उपमुख्यमंत्र्यांवर टीका करणे थांबवले पाहिजे. आपण महायुतीत एकत्र आहोत आणि एकनाथ शिंदे हे अडीच वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून समर्थपणे काम करत आहेत. जर शिंदेंनी तो ऐतिहासिक उठाव केला नसता, तर आज गणेश नाईक मंत्रीही झाले नसते, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांमध्ये आणि देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये अत्यंत चांगला समन्वय आहे. महायुतीत कोणतीही कटुता निर्माण होऊ नये, याची जबाबदारी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली पाहिजे.” संजय राऊतांना सडेतोड उत्तर “पंतप्रधानांना फुटीर खासदारांना भेटायला वेळ आहे, पण संसदेत यायला वेळ नाही,” या संजय राऊत यांच्या टीकेचाही कदम यांनी समाचार घेतला. “पंतप्रधानांनी संसद आणि त्यांचे कार्यक्रम कसे हाताळावेत, हे संजय राऊतांकडून शिकण्याची अजिबात आवश्यकता नाही. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्यास पंतप्रधान पूर्णपणे सक्षम आहेत. अशा निरर्थक आरोपांना उत्तर देण्याचीही गरज मला वाटत नाही,” असे कदम म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर खंत राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करून नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना कदम यांनी वस्तुस्थिती मान्य केली. ते म्हणाले, “मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका आम्हालाही बसत आहे. पेण ते माणगावपर्यंतचा टप्पा अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या कामाच्या गतीबाबत आम्ही स्वतः समाधानी नाही. समृद्धी महामार्ग जसा वेळेत पूर्ण झाला, तसाच हा महामार्गही पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, येत्या सहा ते आठ महिन्यांत या महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.” मनोज जरांगे पाटलांना आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूरमध्ये ‘कोयते आणि तलवारी हातात घेण्याबाबत’ केलेल्या वक्तव्यावर गृहराज्यमंत्री म्हणून प्रतिक्रिया देताना कदम म्हणाले, “कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस योग्य ती कारवाई करतीलच. पण जरांगे पाटील यांनी आजवर समाजाच्या हिताची अत्यंत चांगली भूमिका घेतली आहे. त्यांनी अशा प्रकारची आव्हाने देऊन आपले मूळ लक्ष्य विचलित करू नये. सरकारने त्यांना दिलेली कुणबी प्रमाणपत्रे पूर्णपणे वैध राहतील आणि ती नामंजूर केली जाणार नाहीत, याची कायदेशीर काळजी सरकार नक्की घेईल.” सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या वक्तव्यावर कदम यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. “सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून ज्या कठीण परिस्थितीत शपथ घेतली, त्याची जाणीव काँग्रेसला असायला हवी. जेव्हा सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या होत्या, तेव्हा त्या किती बोलायच्या आणि त्यांची भूमिका काय होती? याचा इतिहास काँग्रेसने आधी तपासून पाहावा. अशा संवेदनशील विषयावर अत्यंत असंवेदनशीलपणे बोलणे पूर्णपणे चुकीचे आहे,” असा टोला त्यांनी लगावला. हेही वाचा… बीडमध्ये एकही कुणबी प्रमाणपत्र रद्द नाही: मनोज जरांगे पाटलांचा दावा तथ्यहीन, महसूल विभागाचा खुलासा बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेवरून रद्द करण्यात आलेले नाही. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विविध वृत्तवाहिन्यांवर केलेले दावे पूर्णपणे तथ्यहीन आणि वस्तुस्थितीला धरून नाहीत, असा स्पष्ट आणि अधिकृत खुलासा बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाला सादर केलेल्या चौकशी अहवालात केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
अमोल मिटकरींनी स्वतःच्या खच्चीकरणाकडे लक्ष द्यावे:योगेश कदम यांचा पलटवार; गणेश नाईकांना दिला इशारा, जरांगे पाटलांना आवाहन