![]()
शिक्षण हे केवळ करिअर घडविण्याचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. घरातील पहिला पदवीधर स्वतःचे भविष्य घडविण्यासोबत संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग खुला करतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. आ. राम शिंदे यांनी केले. भारतीय युवकांमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असून, जग वेगाने बदलत असताना या बदलाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतीय युवकांमध्ये आहे, असेही ते म्हणाले. एमआयटी आर्ट, डिझाइन व टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या ११व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, आयसीएमआरचे माजी महासंचालक पद्मश्री प्रा. डॉ. बलराम भार्गव, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्रभारी कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केवळ ज्ञान पुरेसे नसून त्यासोबत कौशल्य, चारित्र्य आणि सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे. तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी माणुसकीची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे शिक्षण अधिक कौशल्याधारित व संशोधनाभिमुख होत असून, विद्यापीठांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि नवसंशोधनाची वृत्ती निर्माण करावी. प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसह नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत होण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता जागतिक स्तरावर आवश्यक कौशल्ये, संशोधन व उद्योजकतेची दृष्टी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात ‘मॅनेट’चे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा यांना विद्यापीठाच्या जडणघडणीतील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अश्विनी पेठे, डॉ. अभय हरसुळकर, डॉ. प्रणव पाठक यांच्यासह विविध मान्यवरांचाही यावेळी पुरस्काराने गौरव करण्यात आला.
Source link
भारतीय युवकांमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता:प्रा. राम शिंदे यांचे एमआयटी एडीटीच्या स्थापना दिनी प्रतिपादन