![]()
शेतीतील नापिकी, कर्जाचा डोंगर किंवा नैसर्गिक आपत्ती यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे आत्महत्या हा कधीही पर्याय असू शकत नाही. संकटाच्या काळात शासकीय यंत्रणेशी संपर्क साधा; परंतु आत्महत्या करून आपला संसार उघड्यावर आणू नका, असे भावनिक आवाहन आमदार विलास भुमरे यांनी केले. पैठण तालुक्यातील १० आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाच्या मदतीअंतर्गत प्रत्येकी १ लाख रुपयांच्या अर्थसहाय्याचे धनादेश व प्रमाणपत्र आमदार भुमरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या शासकीय मदतीमधील ७० हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मासिक प्राप्ती योजनेत, तर उर्वरित ३० हजार रुपये थेट बचत खात्यात जमा करण्यात आले आहेत. हिरडपुरी येथील सुमित्रा विठ्ठल जगदाळे, आडगाव जावळे येथील गीता प्रकाश भावले, केकत जळगाव येथील सोनाली दत्तात्रय सोहळे व सुनीता भास्कर मगर, वरुडी येथील सुनीता जगन्नाथ महालकर, वाहेगाव येथील सुवर्णा अशोक पवार, ब्रह्मगव्हाण येथील वर्षा रामेश्वर सुरासे, एकतुनी येथील प्रभाबाई कडुबा मुमदल, गेवराई बाशी येथील चंद्रकलाबाई मारुती कनके आणि गेवराई बु. येथील द्रोपदा शिवनाथ वाघ यांच्या वारसांना ही मदत सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाला तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार राहुल बनसोडे, भूषण कावसानकर, विनोद बोंबले, सतीश आंधळे, नंदूअण्णा काळे, अप्पासाहेब निर्मळ, शेखर शिंदे, अण्णाभाऊ लबडे, दादा पाटील बारे, शहादेव लोहारे, नामदेव खरात यांच्यासह विविध अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आई-वडील, पत्नी, मुलांना अनाथ करू नका उपस्थितांशी संवाद साधताना आमदार भुमरे म्हणाले, शेतात नुकसान झाल्यास महसूल, कृषी विभाग व तलाठ्यांकडून तात्काळ पंचनामे करून घ्यावेत आणि त्याची प्रत संबंधित बँकेत जमा करावी. यामुळे कर्जाचा तगादा शिथिल होण्यास मदत होते. आई-वडील, पत्नी व मुलांना अनाथ करू नका. वैयक्तिक व शासकीय स्तरावर मी सदैव मदतीसाठी तत्पर आहे. याप्रसंगी उपस्थित वारसांचे डोळे पाणावले .
Source link
आत्महत्या करू नका; संकटावर मात करण्यासाठी शासन तुमच्या पाठीशी:आमदार भुमरे यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत