![]()
पुण्यातील औंध येथील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमेन अँड चिल्ड्रनमध्ये एका ३४ वर्षीय आयटी कर्मचारी महिलेने पाच गर्भपातानंतर निरोगी बाळाला जन्म दिला. नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ३७ आठवड्यांनी २.८ किलो वजनाच्या मुलाचा जन्म झाला. हे प्रगत उपचारांमुळे शक्य झाले. पिंपळे सौदागर येथील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या या महिलेच्या यापूर्वी पाच गर्भधारणा अपयशी ठरल्या होत्या. पहिली गर्भधारणा सुरुवातीच्या टप्प्यातच संपुष्टात आली. त्यानंतर १७व्या आठवड्यात गर्भाशयाचे मुख वेळेपूर्वी उघडल्याने गर्भपात झाला, जरी टाके घालण्यात आले होते. पुढील गर्भधारणेत गर्भाशयाबाहेर गर्भधारणा झाली. २०२३ मध्ये जुळ्या बाळांची गर्भधारणा झाली होती, परंतु २४व्या आठवड्यात मुदतपूर्व प्रसूती झाल्याने दोन्ही बाळांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वारंवार होणाऱ्या गर्भपातामुळे दाम्पत्याने प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीपली निरवणे यांच्याकडे उपचार घेतले. तपासणीत महिलेचे गर्भाशयाचे मुख कमकुवत असल्याचे आणि गर्भाशयाचा काही भाग पडद्याने विभागलेला असल्याचे (पार्शियल सेप्टेट युटेरस) निदान झाले. या स्थितीमुळे गर्भपात आणि मुदतपूर्व प्रसूतीचा धोका वाढतो. यापूर्वी दोन वेळा योनीमार्गातील गर्भाशयाच्या मुखाला घातलेले टाके अपेक्षित परिणाम देऊ शकले नव्हते. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी लॅप्रोस्कोपिक पद्धतीने पोटातून गर्भाशयाच्या मुखाला टाके घालणे आणि हिस्टेरोस्कोपिक पद्धतीने गर्भाशयातील पडदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या महिनाभरात महिलेला नैसर्गिक गर्भधारणा झाली. संपूर्ण गर्भावस्थेत नियमित तपासण्या आणि सोनोग्राफी करण्यात आली. गर्भाशयाचे मुख लहान होण्याची किंवा मुदतपूर्व प्रसूतीची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. अखेर ३७ आठवड्यांनी नियोजित सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे निरोगी मुलाचा जन्म झाला. डॉ. निरवणे यांनी सांगितले की, वारंवार होणाऱ्या गर्भपातामागील नेमके कारण शोधून त्यानुसार उपचार करणे महत्त्वाचे आहे. योग्य निदान आणि वैयक्तिक उपचारयोजनेमुळे अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांतही निरोगी गर्भधारणेची शक्यता वाढू शकते.
Source link
पाच गर्भपातांनी खचली नाही, अखेर बाळाचा जन्म:पुण्यातील डॉक्टरांच्या उपचारांनी महिलेच्या कुशीत आलं निरोगी बाळ