Headlines

सुपा MIDC मधील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई:पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आदेश, तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश




अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांकडून दूषित सांडपाणी सोडून परिसरातील नैसर्गिक पाणीस्रोत प्रदूषित केले जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून समोर आल्या होत्या. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रदूषण करणाऱ्या या कंपन्यांची सविस्तर माहिती संकलित करून त्यांच्याविरोधात तातडीने कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी औद्योगिक विकास महामंडळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नैसर्गिक पाणीस्रोतांच्या प्रदूषणाबरोबरच स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावरही पालकमंत्री विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. सुपा औद्योगिक वसाहतीतील जे उद्योजक स्थानिक भूमिपुत्र आणि युवकांना नोकऱ्या देण्यास टाळाटाळ करतात, अशा उद्योजकांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नका, असे सक्त निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार असून, स्थानिकांना डावलणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या कंपन्यांवर प्रशासनाचा वचक निर्माण होणार आहे. कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सुपा औद्योगिक वसाहतीतील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सुपा येथे विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी प्रशासनाला हे निर्देश दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीला स्थानिक आमदार काशिनाथ दाते, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे आणि विश्वनाथ कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निरसन करून प्रशासनाने लवकरात लवकर कारवाईचा अहवाल सादर करावा, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले. अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीवर तातडीने कारवाईचे निर्देश सुपा औद्योगिक वसाहत आणि परिसरातील वाढत्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट कालमर्यादा निश्चित करून ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी. तसेच, सुपा बसस्थानक परिसरातील सातत्यपूर्ण वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने अतिक्रमणे हटवून अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी. यासोबतच, पावसाळ्यात गटारीचे सांडपाणी रस्त्यावर साचून नागरिकांना होणाऱ्या त्रासाची प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने दखल घेत उपाययोजना कराव्यात, अशा कडक सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. नारायणगव्हाण रस्ता रुंदीकरण आणि भूसंपादनाला गती नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण येथील प्रलंबित रस्ता रुंदीकरणाच्या प्रश्नावरही या बैठकीत तोडगा काढण्यात आला. रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनीबाबत स्थानिक गावकऱ्यांशी सकारात्मक चर्चा करावी. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया राबवून बाधितांना योग्य तो मोबदला मिळवून द्यावा आणि उर्वरित जमिनीचे तत्काळ सर्वेक्षण करावे, असे निर्देश विखे पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिले. तसेच, या परिसरातील गायरान जमिनी आणि अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी कामगार आयुक्तांसोबत बैठक सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपन्या स्थानिक तरुणांना डावलून बाहेरील कामगारांना कामावर ठेवत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यावर चिंता व्यक्त करत, रोजगारात स्थानिक भूमिपुत्रांनाच प्राधान्य मिळायला हवे, अशी स्पष्ट भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली. याप्रकरणी औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून सविस्तर माहिती सादर करावी. तसेच, स्थानिकांच्या नोकरीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुढील आठवड्यात थेट कामगार आयुक्तांसमवेत विशेष बैठक आयोजित करून कठोर कार्यवाही केली जाईल, असे ठोस आश्वासन विखे पाटील यांनी दिले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *