![]()
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून भाजप आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला. 24 ऑगस्ट रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन यांनी महिला आरक्षण, राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमरावती दुर्घटना, शालेय पोषण आहार आणि कुंभमेळ्यासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांवर निशाणा साधला. महिला आरक्षण विधेयक 2029च्या लोकसभा निवडणुकीपासून लागू करायचे असेल, तर त्यासाठी 2011ची जनगणना आधारभूत मानण्याची भूमिका केंद्राकडून मांडली जात असल्याचा दावा नवनाथ बन यांनी केला. मात्र, या सुधारणेला विरोध करून विरोधकच महिलांना राजकीय आरक्षणापासून दूर ठेवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 2029 मध्ये महिला आरक्षण हवे असेल तर विधेयकाला विरोध का? नवनाथ बन यांनी 2023 मध्ये संसदेत मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाचा संदर्भ देत संजय राऊत यांना लक्ष्य केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०२३ मध्ये मंजूर झालेल्या विधेयकात जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतर महिला आरक्षण लागू करण्याची तरतूद होती. त्यामुळे त्या प्रक्रियेला विलंब झाल्यास महिला आरक्षणाची अंमलबजावणी पुढे ढकलली जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला. “2029 मध्ये महिलांना आरक्षण मिळावे, यासाठी 2011ची जनगणना ग्राह्य धरून आवश्यक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मग या विधेयकाला विरोध करण्याचे कारण काय?” असा सवाल बन यांनी केला. महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राहुल गांधी भूमिका मांडत असताना संसदेत महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकाला विरोध करणे हा विरोधकांचा दुटप्पीपणा असल्याचा आरोपही त्यांनी केला. संजय राऊत 2023 मध्ये काय करत होते? 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर होत असताना राऊत यांची भूमिका काय होती, असा सवालही त्यांनी केला. “२०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले, त्यावेळी तुम्ही राज्यसभेत काय करत होतात, याचे उत्तर महाराष्ट्राला द्या,” असे बन म्हणाले. महिला आरक्षण 2029 पासून लागू करण्याची इच्छा असेल तर सध्याच्या सुधारणेला समर्थन देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. अन्यथा महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणखी पुढे ढकलली जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला. नरेंद्र मोदींच्या चहाविक्रीच्या दाव्यावरूनही राऊतांवर निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालपणीच्या चहाविक्रीच्या दाव्यावरून संजय राऊतांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांवरही बन यांनी प्रतिक्रिया दिली. नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकला होता की नाही, याची माहिती गुजरात आणि देशातील जनतेला आहे, असे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी संजय राऊत यांच्या दाऊद इब्राहिमबाबतच्या पूर्वीच्या वक्तव्यांचाही संदर्भ घेतला. “दाऊदची कॉलर पकडल्याचा दावा केला असेल तर त्याचा पुरावा दाखवा,” असे आव्हान बन यांनी दिले. राहुल गांधींवरही टीकेची झोड राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत बन यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला. राहुल गांधी यांना वारंवार राजकारणात ‘रिलाँच’ करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसमध्ये सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी किती मिळते, असा सवाल करत त्यांनी भाजपमध्ये सामान्य कुटुंबातून आलेल्या अनेक नेत्यांना संधी मिळाल्याचा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांची उदाहरणे त्यांनी दिली. फडणवीसांचा तरुणांशी संवाद राहुल गांधींची नक्कल नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात तरुणांशी साधलेल्या संवादावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेलाही बन यांनी उत्तर दिले. फडणवीस यांचा तरुणांशी संवाद हा नवीन प्रकार नसून 2025 मध्येही वरळी येथील कार्यक्रमात त्यांनी तरुणांशी संवाद साधला होता, असे त्यांनी सांगितले. तरुण आणि प्रथमच मतदान करणारे मतदार भाजपच्या पाठीशी असल्याचा दावा करत २०२९ च्या निवडणुकीतही भाजपला त्यांचा आशीर्वाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमरावतीतील बालकांच्या मृत्यूवर सरकारची भूमिका स्पष्ट अमरावतीतील दुर्घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरही नवनाथ बन यांनी भाष्य केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. शालेय पोषण आहाराच्या कंत्राटावरून विरोधकांकडून सरकारवर होत असलेल्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. मागील सरकारच्या काळातील पोषण आहाराच्या कंत्राटांवर प्रश्न उपस्थित करत बन यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही गंभीर आरोप केले. मात्र, या आरोपांबाबत त्यांनी कोणतेही ठोस पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले नाहीत. कुंभमेळ्याच्या मुद्द्यावरूनही संजय राऊतांना इशारा कुंभमेळ्यावरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेवर नवनाथ बन यांनी आक्रमक भूमिका घेतली. कुंभमेळा हा हिंदूंचा धार्मिक उत्सव असून लाखो भाविक त्यासाठी येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याला विरोध करणाऱ्यांचे राजकीय नुकसान झाले असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांना इशाराही दिला. हिंदू समाजाला जातीच्या आधारावर विभाजित करण्याचे राजकारण विरोधक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शाळांच्या अनुदानावरूनही विरोधकांना प्रत्युत्तर राज्यातील काही शाळांची दुरवस्था असल्याचे मान्य करत सरकार शाळांच्या सुधारणेसाठी प्रयत्नशील असल्याचे बन यांनी सांगितले. मागील सरकारच्या काळात शाळांना पुरेसे अनुदान देण्यात आले नाही, असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हजारो शाळांना अनुदान दिल्याचा दावा त्यांनी केला. ग्रामीण भागातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हेही वाचा… 3 वर्षांत 44 हजार बालकांचा मृत्यू, थातूरमातूर कारवाई नको:राज्यातील सर्वच रुग्णालयांचे ऑडिट करा; रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
अमरावती येथील रुग्णालयातील आग आणि बालकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. रुग्णालयांमध्ये आग लागून निष्पाप बालकांचे बळी जाणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून केवळ एका अधिकाऱ्याला निलंबित करून किंवा थातूरमातूर चौकशी करून हा प्रश्न सुटणार नाही, असा घणाघात त्यांनी केला. या घटनेची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदारांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णालयाचे तत्काळ फायर व सेफ्टी ऑडिट करावे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. हेही वाचा…
Source link
विरोधकांकडून महिला आरक्षण लांबणीवर टाकण्याचे काम:भाजपचा संजय राऊतांना सवाल- 2029 मध्ये आरक्षण हवे असेल तर विधेयकाला विरोध का?