Headlines

मनोज जरांगे काही चुकीचे मागत नाहीत:शिक्षण आणि रोजगार दिला असता तर आंदोलनाची वेळ आलीच नसती, अभिजीत दिपकेंचा पाठिंबा




मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका घेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे यांच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दिपके यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. सरकारने मराठा समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण आणि रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून दिल्या असत्या, तर मनोज जरांगे यांच्यावर आंदोलनाची वेळच आली नसती, अशी टीका त्यांनी केली आहे. राज्यात आज सर्वच जण रस्त्यावर उतरून आंदोलन करत असून हे पूर्णपणे सरकारचे अपयश आहे, असे सांगत आपण लवकरच मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याचे दिपके यांनी स्पष्ट केले. हे सरकारचे अपयश अभिजीत दिपके म्हणाले, मनोज जरांगे सर यांना आंदोलन करण्याची आज वेळ का आली? जेव्हा एखादा व्यक्ती आंदोलन करतो तेव्हा त्याच्या समोरचे ते लास्ट ऑप्शन असते तिथे सरकार त्यांना मजबूर करते. जर सरकारने समाजाच्या मुलाला चांगले शिक्षण दिले असते आणि रोजगाराचे संधी दिली असती तर मनोज जरांगे सरांना आंदोलन करावा लागला असता का? असा सवाल दिपके यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, आज राज्यात सगळेजण आंदोलन करत आहेत. मराठा समाजाच्या मुलांचे शिक्षण चांगले झाले नही, रोजगाराची संधी त्यांना सुद्धा मिळत नाही. हे सरकारचे अपयश आहे की त्यांना आंदोलन करावे लागत आहे. चर्चा करून तोडगा काढा पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, आम्हाला तरी कुठे आवडत होते. आम्हाला जंतर मंतरवर जसे 35 दिवस सरकारने बसवून ठेवले होते. सरकारला माझी विनंती आहे की 31 दिवसांनंतर तुम्ही आमच्या सोबत डायलॉग करायला आले, मनोज जरांगे सरांसोबत तुम्ही असे करू नका, त्यांच्यासोबत बसा चर्चा करा आणि काही नाही काही तोडगा काढा, असे आवाहन दिपके यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील काही चुकीचे मागत नाहीत अभिजीत दिपके म्हणाले, मनोज जरांगे पाटील काही चुकीचे मागत नाहीत. मराठा समाजाच्या मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार मागत आहेत. रोजगाराचा अधिकार मागत आहेत. याची गरज यासाठी पडली आहे की सरकार दोन गोष्टीवर पूर्णपणे अपयशी आहे. मी जरांगे पाटील यांना नक्की भेटणार आहे. ते दिल्लीपर्यंत आले होते. मी इथपर्यंत जाऊ शकतो, असेही दिपके यांनी म्हटले. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे न घेतल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा बॉम्बे हायकोर्टाची टायपिंग परीक्षा रद्द झाली असून, परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी पूर्ण झाली आहे. मात्र यापुढे ज्या सेंटरवर अडचणी आल्या होत्या, तिथे पुन्हा परीक्षा घेण्यात येऊ नयेत, असे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी अद्याप मान्य न झाल्याने आम्हाला नाइलाजाने आंदोलन करावे लागत असल्याचे सांगत ते म्हणाले की, सरकार म्हणत होते की कोर्टामुळे आम्हाला ते करता येत नाही, पण कोर्ट म्हणून आम्ही तयार आहोत तुम्ही फक्त लिस्ट द्या, मात्र सरकार लिस्ट देत नाही. सध्या आदिवासी मुलेही आंदोलनाला बसली असून देशातील असे एकही राज्य नाही जिथे आंदोलन सुरू नाही. त्यामुळे न्याय न मिळाल्यास दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठे आंदोलन उभारले जाईल, असा थेट इशारा दिपके यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *