Headlines

Rohit Pawar Demands MPSC Chairman Resignation Over Prathamesh Deshmukh Suicide


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमध्ये होणाऱ्या कथित अनियमितता आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकारांविरोधात शनिवारी लातूरमध्ये हजारो परीक्षार्थींनी आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हेही या आंदोलनात स

.

रोहित पवार यांनी आपल्या भाषणात परीक्षार्थी प्रथमेश देशमुखच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथील प्रथमेश देशमुख हा एमपीएससी परीक्षांची तयारी करत होता. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांमुळे निर्माण झालेला मानसिक ताण आणि परीक्षेच्या प्रक्रियेवरील विश्वास कमी झाल्यामुळे त्याच्यावर मोठा परिणाम झाला, असा दावा पवार यांनी केला. प्रथमेश हा अभ्यासात हुशार विद्यार्थी होता. शालेय जीवनात त्याने चांगली कामगिरी केली होती. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये अनेकदा त्याला राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळाला होता. मात्र, अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या या तरुणाने अखेर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

‘प्रथमेशच्या मृत्यूला जबाबदार कोण?’

प्रथमेशच्या कुटुंबीयांचा उल्लेख करत रोहित पवार यांनी परीक्षा यंत्रणेवर गंभीर आरोप केले. प्रथमेशच्या वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते. मुलाने अधिकारी व्हावे, हे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रथमेश पुण्यात जाऊन परीक्षेची तयारी करत होता. त्याच्या शिक्षणाचा आणि राहण्याचा खर्च भागवण्यासाठी त्याची मोठी बहीण दरमहा 10 हजार रुपये पाठवत होती, असे पवार यांनी सांगितले. कुटुंबाच्या अपेक्षा आणि स्वतःचे अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्याला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणे गंभीर आहे, असे ते म्हणाले. ‘अशा विद्यार्थ्याच्या मृत्यूसाठी कोण जबाबदार आहे?’ असा सवाल करत पवार यांनी परीक्षा यंत्रणेलाच जबाबदार धरले. एमपीएससीचे अध्यक्ष आणि कथित भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर त्यांनी आरोप केले.

विद्यार्थ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन

या आंदोलनादरम्यान रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांना भावनिक आवाहनही केले. कोल्हापूर येथील परीक्षार्थी सुशांत बल्लाळ याच्या मृत्यूचाही त्यांनी उल्लेख केला. परीक्षेतील अडचणी, प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार किंवा प्रशासनाच्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये, असे पवार म्हणाले. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही. विद्यार्थ्यांनी हा लढा सुरू ठेवावा, आपण एकत्रितपणे पारदर्शक परीक्षांसाठी लढू आणि हा लढा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘प्रश्नपत्रिका फुटलीच नाही’ म्हणणाऱ्या अध्यक्षांवरही निशाणा

एमपीएससीच्या अध्यक्षांच्या भूमिकेवरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांना आणि संबंधितांना आपली बाजू मांडण्यासाठी अध्यक्षांची भेट घ्यायची होती. मात्र, त्यावेळी भेटीसाठी वेळ देण्यात आला नाही, असा दावा पवार यांनी केला. त्यानंतर प्रश्नपत्रिका फुटलीच नसल्याचे सांगणारा व्हिडिओही अध्यक्षांकडून प्रसिद्ध करण्यात आला होता, असे पवार म्हणाले. मात्र, पुढे गुन्हे शाखेने केलेल्या तपासात प्रश्नपत्रिका फुटल्याचे समोर आल्याचा दावा त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर एमपीएससी अध्यक्षांच्या भूमिकेवर पवार यांनी गंभीर सवाल उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणावर सुरुवातीला वेगळी भूमिका घेणाऱ्या अध्यक्षांना आता पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.

पारदर्शक परीक्षांची मागणी

लातूरमधील या आंदोलनात मोठ्या संख्येने एमपीएससी परीक्षार्थी सहभागी झाले होते. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक असावी, प्रश्नपत्रिका फुटीला आळा बसावा आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीच्या जोरावर संधी मिळावी, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी अनेक वर्षे तयारी करतात. त्यासाठी मोठा वेळ, पैसा आणि मेहनत खर्च होते. अशा परिस्थितीत परीक्षेतील गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास ढासळतो. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेणे गरजेचे असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता पुन्हा चर्चेत आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार आणि एमपीएससी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा..

माझा भाऊ जे करेल ते शांततापूर्वकच करेल!:जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या इशाऱ्यावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या- आरक्षणाचा मुद्दा अत्यंत संवेदनशील!

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ जे करायचे ते शांततापूर्वकच करेल, असा मला विश्वास आहे,” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.