![]()
केंद्रातील मोदी सरकारकडून २०२९ पर्यंत देशात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याचे सुतोवाच गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. या निर्णयाचे राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी स्वागत केले असून, यामुळे शेवटच्या घटकाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले मनोज जरांगे पाटील यांनाही त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवाहन करत, त्यांच्या उर्वरित मागण्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे. समान नागरी कायद्यामुळे तळागाळातील लोकांना न्याय दादा भुसे म्हणाले, या निर्णयाचे आपण सर्वांनी स्वागत केले पाहिजे. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाला जी घटना मिळाली आहे, त्यामागे पाठीमागे राहिलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याची आणि शेवटच्या घटकाला न्याय देण्याचीच भावना आहे. याच माध्यमातून ज्या समाजातील लोक मागे राहिले आहेत, त्यांना या कायद्यामुळे न्याय मिळू शकेल.” जरांगेंना गणेशोत्सवाच्या निमित्ताने आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्या ‘मुंबई चलो’ आंदोलनाबाबत बोलताना दादा भुसे यांनी त्यांना सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्रीगणेशाचे पूजन करून करतो. सध्या सगळीकडे गणेशोत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे. त्यामुळे मी जरांगे पाटील यांना विनंती आणि आवाहन करेन की, शासनाने आपल्या बऱ्यापैकी मागण्या मान्य केल्या आहेत. जर काही मागण्या राहिल्या असतील, तर शासन त्याबाबत निश्चितपणे सकारात्मक भूमिका घेईल.” मराठा समाजाच्या आर्थिक स्थितीची सरकारला जाणीव मराठा समाजाच्या सद्यस्थितीवर बोलताना भुसे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. “मराठा समाजामध्ये अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. अनेक कष्टकरी समाज बांधव या समाजात आहेत, आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. शासनाचेही याबाबत बिलकुल दुमत नाही. त्यामुळे जे काही मुद्दे अजूनही प्रलंबित असतील, ते येणाऱ्या काळात सोडवण्याचे काम शासनाच्या वतीने नक्की केले जाईल,” असा शब्द दादा भुसे यांनी दिला आहे. ————– हेही वाचा.. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना:म्हणाले- मरणार पण, शरण जाणार नाही; बंदोबस्तासाठी हजारो पोलिस तैनात; आम्ही गणपती पाहायला जाणार- आंदोलक सलग दोन वेळा परवानगी नाकारूनही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. दोन दिवसांपासून पाणी आणि उपचार सोडल्याने जरांगेंची तब्येत अत्यंत खालावलेली असतानाही, ते आज आंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत.मनोज जरांगे पाटील यांच्या ‘मुंबई चलो’च्या हाकेनंतर आंतरवाली सराटीत त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधवांची मोठी गर्दी उसळली आहे. आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनाला दोनदा परवानगी नाकारली असली, तरी आता जरांगे आणि काही वकिलांनी मिळून तिसऱ्यांदा पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. सविस्तर वाचा
Source link
मराठा समाजाच्या बऱ्यापैकी मागण्या मान्य:उर्वरित मागण्यांबाबतही सरकार सकारात्मक- दादा भुसे, समान नागरी कायद्याचेही केले स्वागत