![]()
प्रतिनिधी | कन्नड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ घोषणा नाही, त्या दिशेने कृती सुरू आहे. अंमलबजावणीही होत आहे, असे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंगळवारी रोजी कन्नड येथे गोदा ते नर्मदा जलयात्रेला संबोधित करताना ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त सरकारतर्फे गोदा ते नर्मदा जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. कन्नडमध्ये यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत झाले. विखे पाटील म्हणाले, राज्यातील १३१ नद्यांच्या पाण्याचे कलश तयार करण्यात आले आहेत. त्याचे लोकार्पण नर्मदा नदीत करण्यात येत आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारने केवळ घोषणा केली नाही. अंमलबजावणी सुरू आहे. सिंचनाचे बंद पडलेले प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. त्यासाठी १५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात २५ हजार कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कोकणातील नद्यांचे पाणी समुद्रात वाहून जाते. ते पाणी महाराष्ट्रात वळवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पाण्याचे संवर्धन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पाणी निर्मितीला मर्यादा आहेत, असे ते म्हणाले. कन्नड तालुक्यात शिवना टाकळी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी १४० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. सर्व कोल्हापुरी बंधाऱ्यांचे जलस्रोत संरक्षित करण्यात येणार आहेत. कन्नड तालुक्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार संजना जाधव म्हणाल्या, अहिल्याबाई होळकर यांनी जल व सिंचनासाठी केलेले काम मोठे आहे. तालुक्यात रायभान जाधव यांनी धरणे केली. त्यांच्या कालव्याचा प्रश्न अपूर्ण आहे. त्यासाठी जलसंपदामंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. पहिल्या टप्प्यात २५ कोटी, दुसऱ्या टप्प्यात १४० कोटी रुपये निधी दिल्याने जलसिंचनाच्या कामाला गती आली आहे. कर्नाटक येथून आलेल्या आकर्षक ढोल पथकानेही जनतेचे लक्ष वेधले. रणरणत्या उन्हात अनवाणी पायांनी त्यांनी ढोल-ताशा वाजवला.
Source link
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी कृतिशील पाऊल:कन्नड येथील कार्यक्रमात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती