Headlines

पराभवाच्या भीतीने उद्धव ठाकरेंची सेफसाईड माघार:विधान परिषद उमेदवारीवरून संजय शिरसाटांचा टोला, मराठीच्या मुद्द्यावरून मनसेवरही टीका




विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर बोचरी टीका केली. “उद्धव ठाकरेंना पराभवाची भीती आहे, तसेच त्यांच्या पक्षातील लोकच त्यांना संपवण्यासाठी तयार आहेत, हे ठाऊक असल्याने त्यांनी ‘सेफसाईड’ म्हणून माघार घेतली,” असे शिरसाट यांनी म्हटले आहे. तसेच मराठीचा पुळका फक्त एका पक्षालाच आहे आणि बाकी आम्ही हिंदी भाषिक आहोत, असे म्हणत संजय शिरसाट यांनी नाव न घेता मनसेवर टीका केली. शिवसेना शिंदे गटाच्या वाढत्या ताकदीबद्दल बोलताना शिरसाट म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ८० पैकी ६० जागा जिंकल्या असून आमचा स्ट्राईक रेट प्रचंड वाढला आहे. राज्यात परिवर्तनाची लाट असून आम्हाला कोणत्याही ‘ऑपरेशन टायगर’ची गरज नाही. रोज एवढे पक्षप्रवेश होत आहेत की आम्हाला वेळ देणे कठीण झाले आहे. कार्यकर्ते स्वतःच्या मर्जीने आमच्याकडे येत आहेत आणि याचे प्रतिबिंब विधान परिषद निकालात नक्कीच दिसेल.” मविआमध्ये काँग्रेसचा अपमान अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या वादावर संजय शिरसाट यांनी भाष्य केले. “महाविकास आघाडीत कधीच एकवाक्यता नव्हती. काँग्रेसने स्पष्ट केले होते की उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच आम्ही तडजोड करू. मात्र, उमेदवार जाहीर होईपर्यंत काँग्रेसला साधी सूचनाही दिली गेली नाही. काँग्रेसचा अपमान करण्याचे काम ‘उबाठा’ गटाने केले आहे. आपला हट्ट सोडायचा नाही या भूमिकेमुळे काँग्रेस आता स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे,” असे ते म्हणाले. सुषमा अंधारेंना सल्ला: गुडघ्याला बाशिंग बांधू नका सुषमा अंधारे यांनी ठेवलेल्या स्टेटसवर टीका करताना शिरसाट म्हणाले, “अंधारे यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, त्यांनी आत्ताच गुडघ्याला बाशिंग बांधू नये. आम्ही 42 वर्षापासून काम करतो. एक-दोन दिवसाचा हा प्रवास नाही आणि त्यासाठी एकनाथ शिंदे असावे लागतात. ज्योती वाघमारे यांना स्वप्नात नसताना एका मिनिटात उमेदवारी देऊन राज्यसभेवर पाठवलं” मराठीच्या मुद्द्यावरून मनसेला प्रत्युत्तर मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना संजय शिरसाट यांनी अप्रत्यक्षपणे मनसेला सुनावले आहे. ते म्हणाले, “मराठी शाळा बंद करणे हा राजकीय विषय असू शकत नाही. मराठी टिकलीच पाहिजे आणि त्यासाठी लढा द्यायला आम्हीही तयार आहोत. मराठीचा पुळका केवळ एकाच पक्षाला आहे आणि बाकी सर्व हिंदी भाषिक आहेत, असे समजण्याचे काही कारण नाही. मराठीच्या स्वाभिमानासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *