Headlines

राष्ट्रवादीत सत्तासंघर्ष पेटला, पक्षात शीतयुद्ध तापलं:प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील तणाव आता उघडपणे चर्चेत; दरी वाढल्याचे स्पष्ट




मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वाचा प्रश्न अधिकच गंभीर बनताना दिसत आहे. अजित पवार यांच्या पश्चात पक्षात पुढील दिशा ठरवताना मतभेद तीव्र झाले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील तणाव आता उघडपणे चर्चेत येऊ लागला आहे. या दोघांमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी उघड झाल्याचे बोलले जात आहे. या वादाची ठिणगी सुनेत्रा पवार यांच्या पक्षाध्यक्षपदी निवडीनंतर अधिकच भडकली. 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीतील पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असे पत्र त्यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आले होते. या निर्णयामुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार दिल्ली दौर्‍यावर असताना प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे दिल्लीत उपस्थित असूनही त्यांनी त्यांच्यापासून दूर राहिल्याची चर्चा रंगली. यामुळे पटेल-तटकरे आणि पवार कुटुंबीयांतील दरी वाढल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या तणावाच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे कौतुक करणारे पत्रक प्रसिद्ध केले. मात्र, या कृतीमागील संदेश वेगळाच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. एका बाजूला कौतुकाचे शब्द आणि दुसऱ्या बाजूला वाढता तणाव, या विरोधाभासी परिस्थितीमुळे पक्षातील वातावरण अधिकच गोंधळलेले दिसत आहे. पक्षाच्या प्रतिमेला नव्याने आकार देण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी दिल्लीतील नरेश अरोरा यांच्या ‘डिझाइन बॉक्स’ या कंपनीकडे प्रसिद्धीची जबाबदारी देण्यात आली होती. अरोरा यांच्या सल्ल्यानुसार अजित पवार यांनी वेगळ्या शैलीत प्रचार केला होता. मात्र, पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अगोदर अरोरा यांच्या कार्यालयावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे वाद निर्माण झाला. यावरून अजित पवारांनीही नाराजी व्यक्त केली होती. नंतर पक्षात अरोरा यांचे महत्त्व कमी करण्यात आले आणि त्यांना दिलेली जबाबदारी काढून घेण्यात आली. या निर्णयामागेही पटेल आणि पार्थ यांच्यातील मतभेद कारणीभूत असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची निवड व्हावी, असा प्रस्तावही अरोरा यांनी मांडल्याचे सांगितले जाते. या प्रस्तावामुळे पक्षात आणखी धुसफूस वाढली. त्यातच पार्थ पवार यांचे पक्षातील वाढते महत्त्व जुन्या नेत्यांना खटकू लागल्याचे दिसून येत आहे. निर्णय प्रक्रियेत त्यांचा वाढता प्रभाव काही ज्येष्ठांना अस्वस्थ करत असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व संघर्ष विधान परिषद निवडणुकीदरम्यान उमेदवार निवडताना देखील मतभेद समोर आले. पार्थ पवार यांनी पुण्यातील एका उद्योगपतीच्या मुलाचे नाव पुढे केले होते, मात्र त्या प्रस्तावाला वरिष्ठांकडून विरोध झाला. अखेरीस माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली. याशिवाय, काही ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांची छायाचित्रे फलकांवर नसल्याचेही लक्षात आले. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेला नेतृत्व संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून, आगामी काळात या वादाचा पक्षाच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *