![]()
सध्याच्या जागतिक राजकारणातील वाढती अराजकता, अस्थिरता आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मानवी संकटांवर गौतम बुद्ध यांच्या अहिंसा व करुणेच्या विचारांमध्येच खरा तारणहार दडलेला असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. आबासाहेब कसबे यांनी केले. शहरातील जेतवन बुद्ध विहार येथे बुद्ध जयंतीनिमित्त १ मे रोजी आयोजित व्याख्यानमालेत ‘तथागत गौतम बुद्ध : विश्वशांतीचा वाहक’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब वानखेडे होते, तर गायक विजयकुमार मोकळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी पंचशील ध्वजारोहण आणि त्रिशरण-पंचशीलाच्या सामूहिक पठणाने झाली. संध्याकाळी झालेल्या व्याख्यानात प्रा. डॉ. कसबे यांनी बुद्धांच्या विचारांचा सखोल आढावा घेत मानवाच्या प्रगती समोरील विकारांवर मात करण्यासाठी संयम, समत्व आणि विवेक यांची गरज अधोरेखित केली. प्रत्येकामध्ये बुद्धत्वाचे बीज आहे आणि ते जागृत करणे हीच खरी बुद्ध विचारांची दिशा आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी गायक विजयकुमार मोकळे यांनी काव्यात्मक शैलीत बुद्धांच्या जीवनकार्याचा वेध घेतला. अध्यक्षीय समारोपात बाळासाहेब वानखेडे यांनीही बुद्ध विचारांचा मानवजातीसाठी असलेला सार्वकालिक संदेश अधोरेखित केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय खरात यांनी केले, सूत्रसंचालन प्रमोद वैद्य यांनी तर आभार प्रदर्शन शिवाजी उबाळे यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप खीर दानाने करण्यात आला. या प्रसंगी वैजापूर शहर व परिसरातील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
युद्धजन्य अस्थिरतेत बुद्धांचे विचारच तारणहार- डॉ. कसबे