![]()
ऐन उन्हाळ्यात बार्शीकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शहर तहानेले राहिले आहे. शहरात ७ ते ८ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे. यावेळी विरोधी गटाचे अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. शहराला उजनी आणि चांदणी या दोन्ही पाणीपुरवठा योजनांमधून पाणी मिळत असतानाही वितरण व्यवस्था कोलमडली आहे. अनियमित वेळापत्रक आणि कमी दाबाने होणारा पुरवठा यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रशासन वितरण व्यवस्था सक्षम करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ब्रिटिशकालीन नैसर्गिक उतारावर आधारित बंद पडलेली ‘पाथरी पाणीपुरवठा योजना’ पुन्हा सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे. प्रशासनाने या योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे सध्या नागरिकांना टँकर आणि विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. संपूर्ण शहरासाठी सक्षम पाइपलाइन वितरण व्यवस्थेचा ‘डीपीआर’ तयार करावा. रिक्त पदे तातडीने भरावीत आणि पाणी टाक्या पूर्ण क्षमतेने सुरू कराव्यात. व्हॉल्व्ह ऑपरेटर आणि हातपंप दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत. जर प्रशासनाने या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर नागरिकांचा उद्रेक होऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही अक्कलकोटे यांनी दिला आहे. या आंदोलनात कृष्णराज बारबोले, महदीमिया लांडगे, सायरा मुल्ला, विद्या बंगाळे यांच्यासह विरोधी गटाचे नगरसेवक सहभागी होते. . नियोजनाचा अभाव: पाणीपुरवठा वेळापत्रकाची कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. . पाणीगळती: शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती होऊन पाण्याचा अपव्यय होत आहे. . तांत्रिक पदे रिक्त: पाणीपुरवठा विभागात अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे भरलेली नाहीत. . अपयशी वितरण: नवीन नळजोडण्या वाढल्या, मात्र पाइपलाइन विस्तार झाला नाही. शहरातील पाणीटंचाईची प्रमुख कारणे समोर
Source link
पाणीटंचाई,‘पाथरी’ योजना पूर्ववतची मागणी:बार्शीत विरोधी पक्षनेते आक्रमक, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन