मुंबई16 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

भारतीय नागरिकांमध्ये जीवन विम्याबाबत कमालीची जागरूकता निर्माण झाली असून, विम्याकडे केवळ ‘करबचतीचे साधन’ म्हणून न पाहता ‘दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेचा साथीदार’ म्हणून पाहण्याचा सकारात्मक बदल देशात दिसून येत आहे. भारताच्या विमा माहिती ब्युरोने (IIB) संकलित केलेल्या आर्थिक वर्ष 2011 ते आर्थिक वर्ष 2025 या 5 वर्षांच्या कालावधीतील आकडेवारीच्या विश्लेषणातून भारतातील विमा संरक्षणाच्या स्थितीत झालेली लक्षणीय प्रगती समोर आली आहे.
कमी रकमेच्या विम्याचे प्रमाण घटले; मोठ्या पॉलिसींकडे ओढा वाढला
IIB च्या अहवालानुसार, गेल्या 5 वर्षांत जीवन विम्याच्या सर्व पॉलिसी श्रेणींमध्ये अधिक रकमेच्या विमा संरक्षणाकडे ग्राहकांचा स्पष्ट कल दिसून आला आहे.
- ₹2 लाख ते ₹5 लाख विमा रक्कम असलेल्या पॉलिसींच्या प्रमाणात 5.6 टक्के अंकांची वाढ झाली आहे.
- ₹10 लाख ते ₹25 लाख विमा रक्कम असलेल्या पॉलिसींमध्ये 2 टक्के अंकांची वाढ झाली.
- ₹50 लाखांपेक्षा अधिक विमा रक्कम असलेल्या मोठ्या पॉलिसींची संख्या तब्बल 68% ने वाढली आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये ही संख्या 44 लाख होती, ती आर्थिक वर्ष 2025 मध्ये 74 लाखांवर पोहोचली असून, यातून ₹975 अब्जांचा वार्षिक प्रीमियम मिळाला आहे.
याउलट, आर्थिक वर्ष 2021 मध्ये ₹2 लाख किंवा त्यापेक्षा कमी विमा रक्कम असलेल्या पॉलिसींचे प्रमाण 65.1% होते, ते आर्थिक वर्ष 2025 मध्ये लक्षणीयरीत्या घटून 53.6% वर आले आहे.
प्रत्येक पॉलिसीमागे सरासरी वार्षिक प्रीमियममध्ये 42.6% वाढ
देशात जीवन विमा पॉलिसींची एकूण संख्या सुमारे 343 दशलक्ष म्हणजेच 34.3 कोटींवर स्थिर असली, तरी पॉलिसीधारक आपल्या आर्थिक संरक्षणासाठी अधिक खर्च करत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. प्रत्येक पॉलिसीमागील सरासरी वार्षिक प्रीमियम 42.6% ने वाढून ₹15,567 (आर्थिक वर्ष 2021) वरून थेट ₹22,195 (आर्थिक वर्ष 2025) वर पोहोचला आहे.
“IIB ची आकडेवारी स्पष्टपणे दाखवते की, जीवन विम्यात दीर्घकाळ टिकून राहणारे भारतीय त्याचे महत्त्व अधिकाधिक ओळखत आहेत. जीवनातील बदल आणि वाढत्या जबाबदाऱ्यांनुसार ते आपल्या विमा संरक्षणात वाढ करत आहेत. पॉलिसीधारक सातत्याने अधिक विमा संरक्षणाकडे वळत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. ज्यांनी अद्याप जीवन विम्याची सुरुवात केलेली नाही, त्यांच्यासाठी संदेश साधा आहे—विमा संरक्षणाची सुरुवात जितकी लवकर कराल, तितका व्यापक आर्थिक बचाव उभारण्यासाठी अधिक वेळ मिळेल.” — श्री. कमलेश राव, अध्यक्ष, विमा जागरूकता समिती (IAC)-Life

बदलाची मुख्य कारणे काय?
विमा क्षेत्रात झालेल्या या सकारात्मक बदलांमागे खालील प्रमुख घटक कारणीभूत ठरले आहेत:
- कोविड-19 चा धडा: महामारीनंतर नागरिकांनी आपल्या आर्थिक सक्षमतेचा आणि विमा संरक्षणातील त्रुटींचा पुन्हा आढावा घेतला.
- वाढती जबाबदारी व महागाई: वाढते उत्पन्न, महागाई आणि जीवनातील बदलत्या टप्पे व जबाबदाऱ्यांमुळे व्यापक विमा संरक्षणाची मागणी वाढली.
- कंपन्यांचे सुलभ पर्याय: विमा कंपन्यांनी ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार लवचिक आणि अधिक अनुरूप उपाय उपलब्ध करून दिले.
- सुरक्षेची खात्री: पारंपरिक बचत उत्पादने प्रामुख्याने संपत्ती निर्माण करण्यास मदत करतात, तर जीवन विमा संपत्ती निर्मितीसोबतच जोखीम आणि बाजारातील अस्थिरतेपासून कुटुंबाचे रक्षण करतो.
पुढील दिशा आणि जनजागृती
विमा जागरूकता समिती – Life (IAC-Life) ने स्पष्ट केले आहे की, लहान वयातच विमा घेतल्यास व्यक्तींना कमी वयात विमा संरक्षण मिळते व त्यांना तुलनेने कमी प्रीमियमचा लाभ मिळतो. उत्पन्न, जबाबदाऱ्या आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे वाढत जातील तसे विमा संरक्षणात टप्प्याटप्प्याने वाढ करता येते. या अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारे, अधिकाधिक भारतीयांनी लवकर जीवन विम्याची सुरुवात करावी आणि दीर्घकालीन आर्थिक सक्षमतेची उभारणी करावी, यासाठी आगामी काळात विशेष जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत.