पुण्यातील विषारी दारूमुळे एक-दोन नव्हे तर तब्बल 15 जणांचा बळी गेला आहे. दापोडी, फुगेवाडी, हडपसर, काळेपडळ परिसरात हे मृत्यू झालेत. महाराष्ट्र काँग्रेसने या घटनेत 18 जणांचा बळी गेल्याचा दावा करत हे सर्व महायुती सरकारच्या बेजबाबदार कारभाराचे खून असल्याच
.
पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मागील 48 तासांत 15 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांना या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून, कुणाचीही गय करू नका, असे ते म्हणालेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने या प्रकरणी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत महायुती सरकारच्या बेजबाबदार कारभाराने केलेले हे प्रशासकीय खून असल्याचा आरोप केला आहे.
ढिसाळ प्रशासनामुळे 18 घरे उद्ध्वस्त
काँग्रेसने म्हटले आहे की, पुण्यातील विषारी दारूमुळे आतापर्यंत 18 नागरिकांचा झालेला मृत्यू ही अत्यंत संतापजनक घटना असून, हा महायुती सरकारच्या बेजबाबदार कारभाराने केलेला थेट प्रशासकीय खून आहे. पोलीस आणि उत्पादन शुल्क (Excise) विभागाच्या भ्रष्ट आशीर्वादाशिवाय राजरोसपणे अशी विषारी दारू विकली जाणे अशक्य आहे. केवळ वसुली आणि ढिसाळ प्रशासनामुळे आज 18 घरे उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती आहे.
या भीषण दुर्घटनेची थेट आणि नैतिक जबाबदारी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. गृहमंत्री केवळ राजकीय गणिते जुळवण्यात आणि स्वतःचे स्थान टिकवण्यात मग्न असल्यामुळे त्यांचे गृहखात्यावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आहे. गुन्हेगारांवर “वरवंटा फिरवण्याच्या” पोकळ वल्गना करणाऱ्या गृहमंत्र्यांचा प्रशासनावर कोणताही धाक उरलेला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी या निष्पाप जीवांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून तात्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, कारण जनतेचे प्राण वाचवू न शकणाऱ्या व्यक्तीला गृहमंत्रीपदाच्या खुर्चीवर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

रोहित पवारांनी पोस्ट केला व्हिडिओ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पुणे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे बघा पुणे पोलिसांची कार्यक्षमता. (गुन्हेगारी रोखण्यासाठी नव्हे तर वसुलीसाठी) ज्यांच्याकडून रक्षणाची अपेक्षा आहे तेच आज वसूली करत आहेत. त्यामुळेच आज सुसंस्कृत पुण्याचा पूर्णतः बट्टयाबोळ झाला आहे. (spy कॅमेराची तारीख अपडेट केलेली नाही, म्हणून व्हिडिओमध्ये जुनी तारीख दिसत आहे), असे ते या प्रकरणी एक व्हिडिओ पोस्ट करताना म्हणालेत.