![]()
सत्ताधारी महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या शिवसेनेत आता सत्तेवरून अंतर्गत धुसपूस सुरू झाली आहे. हिंगोली येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर थेट पक्षनेतृत्त्वालाच आव्हान देत म्हणाले की, म्हाताऱ्या मंत्र्य
.
सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची काल हिंगोलीत सभा झाली. या सभेत बोलताना आमदार संतोष बांगर यांनी उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, सद्यस्थितीत अनेक मंत्री घोड्यावरून शेळ्या हाकत आहेत. ते फोन केला तर रिप्लायही देत नाहीत. हे मंत्री पक्षाला कमजोर करण्याचे काम करत आहेत. काहीजण नुसतेच लोकांमध्ये जातात, पण कोणतेही काम करत नाहीत. मंत्री प्रकाश आबिटकर यांना कधीही फोन केला, तर ते उचलतात. समस्या जाणून घेतात. पण अनेक मंत्रीा म्हातारे झालेत. त्यांना ऐकू येत नाही.
या मंत्र्यांना पदावरून बाजूला करा. या शेळ्यांमागे वाघ दडले आहेत. त्यांना पुढे करा. असे झाले तरच 2029 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असे ते म्हणाले. संतोष बांगर यांनी यावेळी कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. पण त्यांच्या टीकेचा रोख पाहता शिवसेनेतील हे म्हातारे मंत्री कोण? यावर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली आहे.
श्रीकांत शिंदे जागावाटपावर काय म्हणाले?
दुसरीकडे, पत्रकारांनी यावेळी श्रीकांत शिंदे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेत्यांच्या संभाव्य पक्ष प्रवेशाविषयी प्रश्न केला. पण त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. याचवेळी त्यांनी मराठवाड्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यावर आपला भर असल्याचेही स्पष्ट केले. खासदार शिंदे यांनी परभणीत माध्यमांशी बोलताना विधान परिषदेतील जागावाटप व नीट परीक्षेतील गैरव्यवहारांवरही भाष्य केले. ज्या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत, त्या जागांवर आमचाच दावा राहील पण अंतिम निर्णय महायुतीमधील ज्येष्ठ नेते एक-दोन दिवसांत घेतील, असे ते म्हणालेत. परभणी – हिंगोली विधान परिषद मतदारसंघात महायुतीकडून योग्य उमेदवार दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
श्रीकांत शिंदे यांनी यावेळी नीट पेपरफुटीप्रकरणी जे काही घडले ते अत्यंत चुकीचे असल्याचेही स्पष्ट् केले. प्रस्तुत परीक्षेतील प्रकार अत्यंत चुकीचा आहे. दोषींवर कारवाई होईल. तसेच पुढील परीक्षा पारदर्शक पद्धतीने होईल व अशा प्रकारांची पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही. यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहे. भविष्यात ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यावर व प्रत्येक परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर विचार सुरू आहे, असे ते म्हणाले.