Headlines

अकोल्यात कोट्यवधींचा घोटाळा उघड:गजानन पतसंस्थेत गैरव्यवहार; अध्यक्ष आणि सीईओ अटकेत, ठेवीदारांचे 25 कोटी अडकले




अकोल्यातील श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत 8 कोटी 97 लाख रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण आवारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले त्यांचे पुत्र नंदकिशोर आवारे यांना अटक केली आहे. या घटनेमुळे शहरातील ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. अकोल्यातील डाबकी रोड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार गेल्या काही महिन्यांपासून समोर येत होती. ठेवीदारांनी वारंवार पैसे परत मागूनही संस्थेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. गेल्या 6 महिन्यांपासून ठेवीदारांना परतावा देणे बंद करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत होता. अखेर अनेक तक्रारी आणि प्राथमिक चौकशीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात हस्तक्षेप करत मोठी कारवाई केली. चौकशीत संस्थेतील कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. या पतसंस्थेत सुमारे अडीच हजार ठेवीदारांचे पैसे अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. नोकरदार, पेन्शनर, कामगार तसेच घरकाम करणाऱ्या महिलांनी आयुष्यभराची बचत या संस्थेत ठेवली होती. संस्थेतील एकूण ठेवींची रक्कम 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. ठेवीदारांनी आरोप केला आहे की, संस्थेच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अपहार केलेली रक्कम इतरत्र गुंतवली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात पतसंस्थेतील आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली. त्यानंतर अध्यक्ष नारायण आवारे आणि त्यांचे पुत्र नंदकिशोर आवारे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. दोघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणामुळे सहकारी पतसंस्थांच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठेवीदारांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अडकलेली रक्कम परत कधी मिळणार याबाबत चिंता दरम्यान, श्री. गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या अकोल्यात 2 तर तेल्हारा येथे 1 शाखा कार्यरत असल्याची माहिती आहे. एप्रिल महिन्यापासून संस्थेकडून ठेवीदारांना पैसे देणे थांबवण्यात आले होते. त्यानंतर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आता या कारवाईनंतर ठेवीदारांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अडकलेली रक्कम परत कधी मिळणार याबाबत मोठी चिंता कायम आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *