Headlines

अखेर सोलापूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत:2 ऑगस्टपासून आठवड्यातून चार दिवस मिळणार सेवा, जाणून घ्या वेळापत्रक




महिनाभरापासून बंद पडलेली सोलापूर ते मुंबई ही महत्त्वपूर्ण मानली जाणारी विमानसेवा आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे ‘स्टार एअरलाईन’ कंपनीने २ ऑगस्ट २०२६ पासून ही सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सोलापूरच्या व्यापारी, नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. तांत्रिक कारणामुळे बंद होती सेवा सोलापूरवरून मुंबईला जाणारी स्टार एअरलाईनची ही विमानसेवा २८ जून २०२६ रोजी काही तांत्रिक कारणास्तव अचानक बंद करण्यात आली होती. यामुळे तातडीने मुंबई गाठू पाहणारे व्यापारी, उद्योजक आणि विशेषतः मुंबईत तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची प्रचंड गैरसोय होत होती. नागरिकांची ही वाढती अडचण लक्षात घेऊन सोलापूरकरांनी ही सेवा लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी लावून धरली होती. पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा यशस्वी पाठपुरावा नागरिकांच्या या रोषाची आणि मागणीची तातडीने दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट स्टार एअरलाईनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि विमानसेवा तात्काळ सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. याशिवाय, खुद्द मुख्यमंत्री कार्यालयातूनही कंपनीला या संदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडेही गोरेंनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. या सर्व चौफेर प्रयत्नांना अखेर यश आले असून, कंपनीने २ ऑगस्टपासूनच्या प्रवासासाठी आपले ऑनलाइन बुकिंग काउंटर आता खुले केले आहे. आठवड्यातून चार दिवस उड्डाण, जाणून घ्या वेळापत्रक नव्याने सुरू होणारी ही विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशा आठवड्यातील चार दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. सोमवार आणि बुधवारी हे विमान सोलापूरमध्ये सायंकाळी ५.१० वाजता आगमन करेल आणि ५.४० वाजता मुंबईकडे प्रस्थान करेल. तर शुक्रवार आणि रविवारी हे विमान दुपारी १.३० वाजता सोलापूरमध्ये येईल आणि २.०० वाजता उड्डाण करेल. हे वेळापत्रक २ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६ या काळासाठी लागू राहणार असून, त्यानंतर हिवाळी वेळापत्रकानुसार वेळेत बदल होऊ शकतो, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. तिकीट दराची माहिती कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘सोलापूरच्या विकासासाठी हवाई जोडणी महत्त्वाची’ विमानसेवा पूर्ववत झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम हवाई जोडणी अत्यंत गरजेची आहे. विमानसेवा बंद झाल्याने नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील होतो. मुख्यमंत्र्यांनीही सोलापूरकरांच्या या अडचणीची वेळेत दखल घेऊन तत्परतेने पावले उचलली, त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या सेवेमुळे सोलापूरकरांचा प्रवास आता पुन्हा एकदा सुखकर होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *