Headlines

रिद्धपूरमध्ये डायरियाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले:आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे स्थिती नियंत्रणात




रिद्धपूर गावात डायरियाची लागण झालेल्या अनेक रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले असून, लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला जाईल, अशी माहिती यंत्रणांनी दिली आहे. विश्रोळी धरणातून रिद्धपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला तब्बल सहा ठिकाणी गळती लागली होती. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागले. परिणामी, ५० हून अधिक नागरिकांना डायरियाची लागण झाली होती. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेमार्फत गेल्या दोन दिवसांत २१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. याशिवाय, अनेक नागरिकांनी चांदूरबाजार येथील सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये जाऊन उपचार घेतले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांच्या मते, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सुमीत राऊत आणि साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया सिंह यांची चमू गावात तळ ठोकून आहे. तसेच, वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद मेश्राम सतत कार्यरत असून, तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHU) औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. शनिवारपासूनच गावात दूषित पाण्याचा पुरवठा सुरू झाला होता. जलवाहिनी ठिकठिकाणी फुटल्याने त्यात वातावरणातील जीवजंतूंचा शिरकाव झाला. यामुळे शनिवारच्या रात्रीपासूनच नागरिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने सोमवारपासून वेगाने पावले उचलली, ज्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, काही नागरिक अजूनही खाजगी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेत आहेत. सततच्या उलट्या व जुलाबामुळे त्यांना अशक्तपणा आला असून, ते अद्याप पूर्णपणे बरे झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील उपचार सुरूच आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *