![]()
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची दुरवस्था आणि राज्य सरकारचे धोरण यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिवे लावण्याच्या आवाहनावर संताप व्यक्त करताना, “शेतकऱ्यांच्या घरातले वंशाचे दिवे विझत असताना हे दिवे लावून काय साजरे करत आहेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, मराठवाड्याचे नेतृत्व जाणीवपूर्वक संपवले जात असल्याचा आरोप करताना गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडले नसल्याचा दावाही त्यांनी केला. ‘शेतकरी आत्महत्या करतोय अन् हे वाढदिवस साजरे करतायत’ छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज मराठवाड्याची परिस्थिती अतिशय भीषण आहे. इथे नऊ-नऊ दिवसांनी पाणी येतेय, शेतकऱ्याचे प्राण कंठाशी आले आहेत. मुख्यमंत्री आज मराठवाड्यात होते, पण ते कुठे गेले? वाढदिवस साजरा करायला. मी मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, पण त्यांनी दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. इकडे लोडशेडिंग आहे, शेतकऱ्याच्या घरातले वंशाचे दिवे विझतायत, शेतकरी आत्महत्या करत आहेत, आणि अशा वेळेला तुम्ही दिवे लावून ते साजरे करताय? याला काय म्हणायचे ते मला कळत नाही.” माझ्या कर्जमुक्तीचा फायदा थेट शेतकऱ्यांना झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ‘संधी मिळूनही काही न करणारे नाकर्ते’ अशी टीका केली होती. याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, “मी मुख्यमंत्री असताना कोणीही मागणी न करता दोन लाखांपर्यंतची कर्जमुक्ती केली आणि शिवभोजन थाळी योजना आणली. आज सोशल मीडियावर लोक सांगत आहेत की, ‘उद्धव ठाकरेंनी १५ दिवसांत आमची कर्जमुक्ती केली होती’. मी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पैसे टाकले होते. पण गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी जे ‘इतिहासातले सर्वात मोठे पॅकेज’ जाहीर केले, त्यातील साडेतीन लाख रुपयांपैकी साडेतीन रुपये तरी शेतकऱ्यांना मिळालेत का?” नियोजनाचा अभाव आणि नियम लादण्यावर टीका सरकारच्या पूर्वतयारीच्या अभावावर बोट ठेवत ठाकरे म्हणाले की, “अल निनोच्या धोक्याची कल्पना असताना तुम्ही आधीच तयारी का केली नाही? कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर करून काम सुरू केले, तुम्ही का नाही करत?” एनडीआरएफच्या (NDRF) निकषांवर टीका करताना ते म्हणाले, “कायदा जनतेसाठी असतो, जनता कायद्यासाठी नाही. आपत्ती आल्यावर जर निकषात बसत नाही म्हणून मदत थांबणार असेल, तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही नालायक आहात.” येत्या काळात नवरात्रीत आणि दसऱ्यानंतर संपूर्ण राज्यभर, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात शिवसेनेचे नेते शेतकऱ्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलन मराठवाड्यापुरते मर्यादित राहणार नाही ५ ऑक्टोबरनंतर नवरात्रोत्सवाच्या काळातही शिवसेना ठाकरे गटाचे नेते मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दौरे व आंदोलने करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पश्चिम विदर्भातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोर्चा काढला जाणार असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन राज्यव्यापी करण्याचे संकेत त्यांनी दिले. मराठवाड्याचे नेतृत्व संपवण्याचा कट; मुंडेंच्या मृत्यूचे गूढ कायम मराठवाड्याच्या नेतृत्वाबाबत बोलताना ठाकरेंनी गंभीर आरोप केले. “मराठवाड्याचे नेतृत्व जाणीवपूर्वक संपवले जात आहे. दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी धरण बांधले, त्यांचे कर्तृत्व कुणी नाकारू शकत नाही. पण सध्याचे सरकार १२ वर्षे सत्तेत राहून मराठवाड्यासाठी काय करत आहे? यांना शेतकरी मेला तरी चालेल, पण कॉन्ट्रॅक्टरसाठी शक्तीपीठ महामार्ग हवाय,” अशी टीका त्यांनी केली. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत बोलताना ते म्हणाले की, “मला कोणावर आरोप करायचा नाही, पण हे दोन नेते, ज्यांच्याकडे आपण देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहत होतो, त्यांचे असे अचानक जाणे खंत निर्माण करणारे आहे. गोपीनाथ रावांचा मृत्यू कसा झाला, याबाबत त्यावेळी मोठा संशय व्यक्त झाला होता. हे मृत्यूचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही, असे मला वाटते. जर उलगडले असेल तर ते सांगावे.” हेही वाचा.. गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू अजूनही रहस्यमय:उपमुख्यमंत्री ढोकळा खाण्यासाठी गुजरातला गेले, सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा- उद्धव ठाकरे मराठवाड्याचा वाढता अनुशेष, भीषण दुष्काळ, पाणीप्रश्न आणि बेरोजगारी यांसारख्या प्रश्नांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत चालवलेल्या ‘तुमसे ना हो पायेगा’ या जनआंदोलनाचा समारोप आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा
Source link
अडीच वर्षांत मी शेतकऱ्यांना थेट कर्जमुक्ती दिली:आता तुमचे साडेतीन रुपये तरी शेतकऱ्यांना मिळालेत का? मुख्यमंत्र्यांच्या टीकेला ठाकरेंचे प्रत्युत्तर