Headlines

आदित्य ठाकरे हे 'UBT'चे अभिषेक बॅनर्जी!:मंत्री नितेश राणेंची सडकून टीका, म्हणाले- काँग्रेस विलीनीकरणाच्या डावामुळेच त्यांचे खासदार फुटले




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 6 खासदारांनी अचानक दिल्लीतील बैठकीला दांडी मारत स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व नाट्यमय घडामोडींमागे नेमके काय कारण आहे, याबाबत राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी अत्यंत मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांना आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा होता आणि त्यांना काँग्रेसमध्ये ‘राष्ट्रीय सरचिटणीस’ पदाची अपेक्षा होती, याच कारणामुळे निष्ठावान खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली, असा थेट आरोप नितेश राणे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे हे उबाठाचे ‘अभिषेक बॅनर्जी’! नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) अभिषेक बॅनर्जी यांचे वर्चस्व आहे, अगदी तसेच उबाठा (UBT) गटामध्ये आदित्य ठाकरे हे काम करत आहेत. आदित्य ठाकरे हे खऱ्या अर्थाने उबाठाचे अभिषेक बॅनर्जी बनले आहेत आणि त्यांच्या याच कार्यपद्धतीमुळे सर्व खासदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.” ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा डाव
बंडखोर खासदारांच्या हवाल्याने नितेश राणे म्हणाले, “पक्ष सोडणाऱ्या खासदारांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आदित्य ठाकरे यांना उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा होता.” राणेंनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट करत सांगितले की, “माझ्या ऐकण्यात असेही आले आहे की, आदित्य ठाकरे लवकरच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार होते. एवढेच नव्हे तर, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांची अशीही तयारी होती की, विलीनीकरणानंतर आदित्य यांना काँग्रेसमध्ये थेट ‘राष्ट्रीय सरचिटणीस’ यासारखे महत्त्वाचे पद दिले जावे.” निष्ठावान शिवसैनिक हे कसे खपवून घेणार?
हा सर्व डाव समोर आल्यामुळेच शिवसेनेत बंड झाल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “मग जे खासदार आणि कार्यकर्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालतात, जे मूळ आणि निष्ठावान शिवसैनिक आहेत, ते आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायला कसे तयार होतील? त्यामुळेच त्यांनी हा मार्ग निवडला.” गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर हे 6 खासदार एकनाथ शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ‘काँग्रेस विलीनीकरणाचा’ मुद्दा पुढे केल्यामुळे आता या राजकीय संघर्षाला एक वेगळेच वळण लागले आहे. आदित्य ठाकरेंच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळेच पक्षात ही उभी फूट पडल्याचा आरोप त्यांनी यानिमित्ताने केला आहे. संबंधित बातमी वाचा… ‘आगे आगे देखो होता है क्या!’:ठाकरेंच्या 6 खासदारांनंतर आता 14 आमदारही फुटणार? शिवसेनेचे संतोष बांगर, बच्चू कडू ते शंभूराज देसाईंचा दावा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असतानाच आता ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटातील तब्बल 13 ते 14 आमदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, असा मोठा दावा केला आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतर आता ‘ऑपरेशन टायगर 2.0’ची चर्चा सुरू झाली असून, बांगर यांच्या विधानामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी वाचा ओमराजे निंबाळकर यांनी दिव्य मराठीला दिलेली मुलाखत दिव्य मराठी मुलाखत:प्रश्न पक्षांतराचा निर्णय का?, निष्ठा आहे पण लाेकांची कामे करता येत नसतील तर काय उपयाेग?- ओमराजे समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही, अशा शब्दांत उद्धवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याबाबत आपली परखड भूमिका मांडली. उद्धवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओमराजे यांनी पहिलीच मुलाखत ‘दिव्य मराठी’ला दिली. येथे वाचा संपूर्ण मुलाखत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *