Headlines

आदिवासी समाजाच्या विकासासाठी वास्तव प्रश्नांवर लक्ष देण्याची गरज:अमरावती विद्यापीठात 'जागतिक आदिवासी दिवस' व्याख्यानाचे आयोजन




संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आदिवासी अध्यासन केंद्रात ‘जागतिक आदिवासी दिवस’ निमित्त आयोजित व्याख्यानात आदिवासी समाजाच्या सर्वसमावेशक विकासाची गरज अधोरेखित करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, जल, जंगल, जमीन हक्क आणि स्थलांतर-विस्थापन यांसारख्या वास्तव प्रश्नांची जाणीव ठेवून विकास साधण्यावर भर देण्यात आला. हे व्याख्यान संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आदिवासी अध्यासन केंद्र आणि मातोश्री मुली-मुलींचे वसतीगृह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक आदिवासी दिवस: समज आणि वास्तव’ या विषयावर ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे विभागप्रमुख डॉ. शामराव कोरेटी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आदिवासी अध्यासन केंद्र प्रमुख डॉ. मनिषा कोडापे, वसतीगृहाचे वार्डन डॉ. अशोक राठोड आणि डॉ. जागृती बारब्दे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्ष आणि प्रमुख अतिथींनी मार्गदर्शन करताना आदिवासी समाजाची भाषा, संस्कृती आणि ज्ञानपरंपरा जपण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. समज आणि वास्तवातील अंतर कमी झाल्यास समतामूलक समाजाची उभारणी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका नाले यांनी केले, तर माणीम गायल हिने आभार प्रदर्शन केले. या व्याख्यान कार्यक्रमाला डॉ. संदीप वाघुळे, डॉ. नितीन फिरके, डॉ. कमलाकर मोरे, डॉ. नंदकिशोर गव्हाळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *