Headlines

आमदार निवासात पाण्याची टंचाई:कॅन्टीनमध्ये कागदी प्लेट्स वापरण्याची वेळ; विजय वडेट्टीवारांनी पाणीटंचाईवरून सरकारला घेरले




महाराष्ट्रात सध्या पाणीटंचाईचे भीषण संकट गडद होत चालले असून, विरोधकांनी यावरून सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “संपूर्ण राज्य दुष्काळाच्या छायेत होरपळत असताना, महायुती सरकार मात्र केवळ आमदार आणि खासदार फोडण्याच्या राजकारणात मग्न आहे,” असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशन तोंडावर आलेले असताना मुंबईतील आमदार निवासातील एक धक्कादायक वास्तव वडेट्टीवार यांनी समोर आणले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमदार निवासात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये भांडी धुण्यासाठीही पाणी शिल्लक नसल्याने, लोकप्रतिनिधींना चक्क कागदी प्लेट्समध्ये जेवण वाढण्याची वेळ आली आहे. “ज्या सरकारला स्वतःच्या आमदारांच्या निवासातील पाण्याचे साधे नियोजन करता येत नाही, ते संपूर्ण महाराष्ट्राचा पाण्याचा एवढा मोठा प्रश्न कसा काय सोडवणार?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. जनतेला राजकारण नको, पाणी हवे आहे! राज्यातील धरणांमधील पाणीसाठा आता अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला असून, ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक प्रमुख शहरांमध्येही आतापासूनच पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या गंभीर परिस्थितीवर बोट ठेवत विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, “एकीकडे महाराष्ट्रातील जनतेला पिण्याच्या पाण्याचा एक थेंब मिळणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री नाशिक विधानपरिषदेच्या घोडेबाजारात व्यस्त होते, तर उरलेले मंत्री पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याऐवजी विरोधकांचे लोकप्रतिनिधी पळविण्यात मग्न आहेत. सत्ताधारी आमदार आता पाण्यासाठी टॉवेलवर येऊन मारामारी करणार आहेत का?” असा टोला विजय वडेट्टीवार यांनी सरकारला लगावला. सत्तेचा खेळ थांबवण्याचे आवाहन “महाराष्ट्रातील जनता सध्या पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करत असून, त्यांना सध्याच्या घडीला या घाणेरड्या राजकारणात रस नाही, तर पाणी हवे आहे,” असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. “सरकारने आपला हा सत्तेचा खेळ आता कुठेतरी थांबवावा आणि राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पाणीटंचाईच्या प्रश्नावर तातडीने आणि ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी त्यांनी केली आहे. या आक्रमक भूमिकेमुळे आगामी पावसाळी अधिवेशनात पाणीटंचाईचा मुद्दा चांगलाच गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *