![]()
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष आमदार विवेक कोल्हे हे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या राज्यस्तरीय समितीवर कार्यरत असून, त्यांच्या पुढाकारामुळे सभासद शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात हमखास वाढ होत आहे, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. एन. एन. पाटील यांनी केले. शिंगणापूर येथील कोल्हे साखर कारखान्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयोजित ‘ऊस शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता आढावा व हुमणी कीड नियंत्रण’ कार्यशाळेत ते बोलत होते. प्रारंभी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे यांनी प्रगतीचा आढावा मांडला. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कमी खर्चात अधिक उत्पादनाच्या योजना थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी कृषीतज्ज्ञ एम. ए. जाधव, एस. ए. वालकुंदे, एस. एस. पडोळ आणि नितीन शिंदे यांनी कृषक, “मॅप माय क्रॉप’ व “फसल’ ॲपबाबत शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. शास्त्रज्ञ डॉ. तुषार शितोळे यांनी हुमणी कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करण्याचे मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला बापूसाहेब बारहाते, ज्ञानदेव औताडे, त्रंबक सरोदे, शेतकी अधिकारी नारायण चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. उपग्रहाद्वारे होणार पिकांचे विश्लेषण डॉ. पाटील पुढे म्हणाले की, व्हीएसआय आणि बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पथकाने ऊस क्षेत्राला भेटी देऊन पानांचे नमुने गोळा केले. या तंत्रज्ञानात उपग्रहाद्वारे (सॅटेलाईट) पिकांच्या छायाचित्रांचे विश्लेषण केले जाते. यामुळे पिकाला कुठे पाणी कमी-जास्त आहे, खतांची कमतरता कुठे आहे, किंवा किडीचा प्रादुर्भाव कुठे होणार आहे, यासारख्या सूक्ष्म बाबींची माहिती मिळून उत्पादन वाढवणे शक्य होणार आहे.
Source link
एआय तंत्रज्ञानातून ऊस उत्पादनात हमखास वाढ:कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळेत शास्त्रज्ञ डॉ.एन.एन.पाटील यांचे मार्गदर्शन