![]()
चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी 16 ऑगस्ट रोजी चाकण येथे प्रत्यक्ष बैठक घेण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये चाकणमधील रस्त्यांच्या दुर्दशेबाबत बातम्या प्रसिद्ध होत आहेत. रस्त्यांच्या या गंभीर समस्येमुळे कंपन्या स्थलांतरित होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम रोजगारावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सामंतांची फोन करत चर्चा या परिस्थितीची दखल घेत, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज चाकणमधील औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. केवळ चर्चेपुरत्या समस्या न ठेवता, त्या प्रत्यक्ष समजून घेऊन मार्ग काढण्यासाठी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. आवश्यक पायाभूत सुविधा देणार उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले की, चाकण हे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील महत्त्वाचे केंद्र आहे. येथील उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या अडचणी दूर करणे हे शासनाचे प्राधान्य आहे. रस्ते, वाहतूक आणि इतर पायाभूत सुविधांबाबतच्या उद्योजकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन संबंधित विभागांच्या समन्वयातून तातडीने उपाययोजना केल्या जातील. ठोस निर्णय घेतले जाणार दरम्यान, चाकणमधील औद्योगिक संघटनांनीही उद्योगमंत्र्यांसोबत होणारी चर्चा सकारात्मक पद्धतीने करण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्रातून उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, तसेच विद्यमान उद्योगांचे संरक्षण करून चाकण परिसरातील रोजगाराच्या संधी कायम राहाव्यात, यासाठी शासन आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यात समन्वयातून मार्ग काढला जाईल. चाकणच्या औद्योगिक विकासाला गती देताना उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे. संबंधित सर्व घटकांशी संवाद साधून ठोस निर्णय घेतले जातील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
Source link
चाकणमधील एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही:उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन सकारात्मक- उद्योगमंत्री उदय सामंत