Headlines

चेंबूरमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या:‘बाळ माझं नाही, बाप दुसराच’ म्हणत डांबराच्या गोळ्या मिसळलेलं शीतपेय पाजलं




मुंबईच्या चेंबूरमधून एक धक्कादायक हत्या प्रकरण समोर आलं आहे. ‘बाळ माझं नाही, बाप दुसराच’ या संशयातून प्रियकराने गर्भवती प्रेयसीचा जीव घेतल्याचा आरोप आहे. चेंबूरच्या मैसूर कॉलनी परिसरात आशिष मगर याने आपल्या प्रेयसी विष्णूमायाला डांबराच्या गोळ्या मिसळलेलं शीतपेय पाजल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विषारी पदार्थामुळे विष्णूमायाची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी आशिष मगरला अटक केली आहे. नेमक काय आहे प्रकरण 25 ऑगस्टच्या रात्री दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर काही वेळाने परिस्थिती शांत झाली. त्यानंतर आशिषने विष्णूमायाला शीतपेय दिलं. मात्र, या पेयात त्याने आधीच डांबराच्या गोळ्या टाकल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. शीतपेय प्यायल्यानंतर काही वेळातच विष्णूमायाची प्रकृती अचानक बिघडली. तिला उलट्या होऊ लागल्या, चक्कर येऊ लागली आणि तिची प्रकृती झपाट्याने खालावली. सुरुवातीला कुटुंबीयांना हा त्रास आजारपणामुळे होत असल्याचं वाटलं. मात्र, परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं. खासगी रुग्णालयातून पुढील उपचारांसाठी तिला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केलं. मृत्यूपूर्वीच्या वक्तव्याने पोलिसांचा संशय बळावला विष्णूमायाच्या मृत्यूनंतर सुरुवातीला तिचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला असावा, असं कुटुंबीयांना वाटत होतं. मात्र, प्रकृती बिघडल्यानंतर विष्णूमाया वारंवार ‘शीतपेय प्यायल्यानंतरच मला त्रास सुरू झाला’ असं सांगत असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला. घटनास्थळावरील परिस्थिती, कुटुंबीयांचे जबाब आणि आशिषसोबत झालेल्या वादाची माहिती तपासण्यात आली. त्यातून पोलिसांचा संशय आशिष मगर याच्यावर केंद्रित झाला. पोलिसांनी आशिषला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांना वेगवेगळी माहिती देत प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, चौकशीत त्याच्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला. चौकशीनंतर आशिषने विष्णूमायाला डांबराच्या गोळ्या मिसळलेलं शीतपेय दिल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर या प्रकरणाला हत्येचं स्वरूप आल्याच स्पष्ट झालं. शवविच्छेदनात महत्त्वाचे पुरावे विष्णूमायाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यावेळी तिच्या शरीरात विषारी पदार्थांचे अंश आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ती साधारण अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचंही वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झालं. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, विष्णूमायाच्या गर्भातील बाळ आपलं नसल्याचा संशय आशिषला होता. याच संशयातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी आशिष मगर याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि आरोपीच्या जबाबाची पडताळणी केली जात आहे. मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त मनोजकुमार शर्मा, पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त समीर शेख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. एका गर्भवती तरुणीचा केवळ चारित्र्यावरील संशयातून जीव गेल्याने चेंबूर परिसरात या घटनेची जोरदार चर्चा असून, प्रकरणातील उर्वरित बाबींचा पोलीस तपास करत आहेत. हेही वाचा.. सुप्रीम कोर्ट अमित शहांच्या खिशात आहे का?:मी आहे ना, सर्व सेट होईल; अमित शहा-एकनाथ शिंदेंच्या कथित संवादावरून संजय राऊतांचा हल्लाबोल मोहन भागवत जी विधाने अमेरिकेत करत आहे ती विधाने भारतात आल्यावर केली पाहिजे. नागपूर आणि दिल्लीमध्ये असे विधाने त्यांनी केली पाहिजे. संघाने भारतात एक आणि बाहेर देशात एक अशी भूमिका घेऊ नये, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होणार नाही, शरद पवारांनी काय सुनेत्रा पवार यांच्या हाताखाली काम करायचे का? त्यांची प्रकृती साथ देत नसली तरी ते शरद पवार आहे. त्यांच्या पक्षात हुशार लोकं आहेत ते योग्य निर्णय घेतील.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *