![]()
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापले असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उद्या, 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे कूच करत आहेत. मात्र, जरांगे यांच्या या भूमिकेवर भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी सडकून टीका केली असून, स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी आणि केवळ वैयक्तिक स्वार्थापोटीच जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. आमदार विजय रहांगडाले म्हणाले, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश फक्त भाजप नेत्यांना खाली दाखवणे, शिव्या देणे आणि स्वतःचे नाव मोठे करणे हाच राहिलेला आहे. स्वतःच्या हिताकरिता आणि स्वार्थासाठी हे आंदोलन चालवले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा उद्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातूनच पूर्ण होईल, असेही रहांगडाले यांनी म्हटले. उपोषणाची तयारी पूर्ण दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, संपूर्ण वातावरण तापल्याचे चित्र आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्यापासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही- मनोज जरांगे दुसरीकडे, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी देखील जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल होत आहेत. ‘आता कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही,’ असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. तसेच, ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना सरकारने तात्काळ कुणबी प्रमाणपत्रे वितरित करावीत, अशी प्रमुख मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे.
Source link
'जरांगेंच्या आंदोलनाचा उद्देश फक्त भाजप नेत्यांना शिव्या देणे..':मनोज जरांगेंच्या उपोषणावर विजय रहांगडाले यांची टीका