![]()
प्रतिनिधी | जळगाव मागील वर्षी १० मे रोजी जळगावचे कमाल तापमान ३८.६ अंश होते. २०२५च्या संपूर्ण मे महिन्यात उच्चांकी तापमानही ४४ पर्यंतच मर्यादित राहिले. मात्र यंदा १० मे रोजीच तापमान ४४.५ अंशांपर्यंत पोहोचल्याने तुलनेत ५.९ अंशांची वाढ नोंदवली गेली. यामुळे यंदाचा मे महिना अधिक उष्ण आणि त्रासदायक ठरत आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत. हवेतील ओलावा, उष्णतेसोबत उकाड्याची तीव्रताही वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. विशेषतः दुपारी शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पुढील काही दिवस वायव्य दिशेकडून मध्यम वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. – नीलेश गोरे, हवामान अभ्यासक उष्णतेचा प्रभाव १३पर्यंत कायम ११ ते १३ मे दरम्यान कमाल तापमान ४१ ते ४४ अंश राहील. विशेषतः ११ आणि १२ मे रोजी काही भागांत तापमान पुन्हा ४३ ते ४४ अंशांच्या जवळ पोहोचू शकते. १३ मे नंतर तापमानात घसरण शक्य असली तरी उष्णतेचा प्रभाव कायम राहील. रात्रीही २६ ते २९ अंश तापमानामुळे उकाड्याचा त्रास जाणवू शकतो. तीन दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. काही भागांत हलके ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. अशी आहेत तापमान वाढीची प्रमुख कारणे उत्तर भारतातील सक्रिय उच्च दाब क्षेत्रामुळे गरम आणि कोरडी हवा दक्षिणेकडे सरकत आहे. आकाश बहुतांश स्वच्छ असल्याने सूर्याची तीव्र किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. जिल्ह्यात घटलेले वनक्षेत्र, वाढलेली ओसाड जमीन आणि काँक्रिटीकरण उष्णता शोषून पुन्हा हवेत सोडतात. बंगाल उपसागरातील कमी दाब क्षेत्र अद्याप पूर्ण ताकदीने विकसित न झाल्याने ओलसर वाऱ्यांचा पुरेसा प्रभाव निर्माण होत नाही. त्यामुळे तापमान वाढले आहे.
Source link
जळगावचा पारा ४४.५ अंशांवर;गेल्या वर्षापेक्षाही ५.९ अंश जास्त:अाजपासून तीन दिवस उष्णतेची लाट; १५ मे नंतर पाऊस