![]()
डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून विरोधकांमध्ये मतभेद सुरू असतानाच राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) शरद पवार यांच्या भूमिकेनुसार निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचे समर्थन करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिरसाट यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भूमिका मांडली. जिल्हा बँकेत महायुतीचा ‘फॉर्म्युला’ शिरसाट म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महायुतीने एकत्र लढवली असून शिवसेनेचे 9, भाजपचे 7 आणि राष्ट्रवादीचे 2 संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाचा नैसर्गिक हक्क शिवसेनेकडे आला आहे. त्यांनी सांगितले की, पहिली दोन वर्षे अध्यक्षपद शिवसेनेकडे, त्यानंतरची दोन वर्षे भाजपकडे आणि शेवटचे एक वर्ष राष्ट्रवादीकडे राहील. “यामध्ये कुणी कुणावर कुरघोडी केलेली नाही. नैसर्गिक न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे,” असे ते म्हणाले. डिलिमिटेशन विधेयकाला बहुमत मिळेल मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, राष्ट्रवादीमध्ये वेगवेगळ्या भूमिका असल्या तरी अंतिम निर्णय शरद पवार यांच्या आदेशानुसारच होईल. “डिलिमिटेशनचे विधेयक सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादीच नव्हे तर ठाकरे गटालाही त्याचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होईल, याबाबत कोणतीही शंका नाही,” असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भूमिका दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जबाबत विचारले असता शिरसाट म्हणाले, आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होते. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र, लाठीचार्ज झाला असेल तर त्याचे समर्थन आम्हीही करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रमेश म्हा त्रे प्रकरणावर काय म्हणाले? शिवसेना पदाधिकारी रमेश मात्रे यांच्यावर झालेल्या पोलिस कारवाईबाबत शिरसाट म्हणाले की, सत्तेत असतानाही स्वतःच्या नगरसेवकावर कारवाई होणे हे धैर्याचे लक्षण आहे. “आम्ही कुणालाही पाठीशी घालत नाही. पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. त्यानंतर पक्षीय पातळीवर कोणती कारवाई करायची, याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील,” असे त्यांनी सांगितले. संजय राऊतांवर टीका एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांच्या सातत्याने होणाऱ्या टीकेवर शिरसाट यांनी पलटवार केला. “रोज तेच बोलत राहणे, स्वतःवरच फोकस ठेवणे आणि पक्षाच्या धोरणांपेक्षा वैयक्तिक प्रसिद्धीला महत्त्व देणे, यामुळेच ठाकरे गटाची आजची परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा टोला त्यांनी लगावला. ईडीवरही भाष्य विरोधकांकडून ईडीच्या गैरवापराचे आरोप होत असल्याबाबत शिरसाट म्हणाले, “आज ईडी कुठे दिसते? जे चुकीचे काम करतील त्यांच्यावर ईडीची कारवाई होईल. पण कोणत्याही तपास यंत्रणेने आमच्यावर कारवाई करू नये, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही.” सुप्रिया सुळेंच्या कृतीचे समर्थन सुप्रिया सुळे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना वाकून नमस्कार केल्याच्या व्हिडिओवरून सुरू असलेल्या चर्चेबाबत शिरसाट म्हणाले, “राजनाथ सिंह हे ज्येष्ठ नेते आहेत. महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे ज्येष्ठांचा आदर करणे. आम्हीही शरद पवार यांच्या पाया पडतो. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कृतीत काहीही गैर नाही.” फोटो व्हायरल प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी गिरीश महाजन यांचे कथित छेडछाड केलेले फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीला अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिरसाट म्हणाले, “राजकीय नेत्यांचे बनावट फोटो आणि व्हिडिओ तयार करण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत.” संबंधित बातमी वाचा.. विरोधकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाहीची नांदी!:दिल्लीतील आंदोलकांवरील लाठीचार्जवरून प्रकाश आंबेडकरांची भाजप आणि काँग्रेसवर घणाघाती टीका दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि आंदोलकांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीत उत्तरदायित्वाची मागणी, संवाद आणि शांततापूर्ण आंदोलन हीच खरी लोकशाहीची ओळख असल्याचे सांगत, आंदोलकांचा आवाज दडपणे म्हणजे हुकूमशाहीचे लक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर होणार!:संजय शिरसाट म्हणाले- शरद पवारांचा आदेश राष्ट्रवादी मान्य करेल