![]()
ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकीचे मुख्य महाव्यवस्थापक हेमंत कुमार नंदा यांनी म्हटले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली तरी विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. तंत्रज्ञान कितीही बदलले तरी शिक्षकांचे महत्त्व कायम राहणार असून, शिक्षकच विद्यार्थ्यांना संस्कार, मूल्ये आणि दिशा देणारे खरे मार्गदर्शक आहेत. शिक्षक दिनानिमित्त दि ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प्लॉईज एज्युकेशन सोसायटीने रेंज हिल्स हायस्कूलमध्ये ‘केळुसकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात नंदा बोलत होते. नंदा यांनी सांगितले की, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांना केवळ अभ्यासाचे ज्ञान देणे पुरेसे नाही. त्यांना विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार, मूल्ये, आत्मविश्वास, कौशल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचे मोठे काम करावे लागेल. यावेळी एस. एम. जोशी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा कमलाकर, प्रा. डॉ. प्राची साळवे, सुलभा गायकवाड आणि शशिकांत तीकोटे यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक योगदानाबद्दल ‘केळुसकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, आयआयएम जम्मूचे अध्यक्ष आणि डिक्कीचे संस्थापक पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे होते. ॲम्युनिशन फॅक्टरीचे व्यवस्थापक नितीश द्विवेदी, संस्थेचे सचिव गौतम भोसले, सहसचिव राजेंद्र साळवे, उपाध्यक्ष शैलेंद्र जगताप, विश्वस्त प्रकाश वनशिव, मुख्याध्यापिका अश्विनी राऊत, मुख्याध्यापिका अमृता ग्रोव्हर, मुख्याध्यापक सोमनाथ बोभाटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. डॉ. मिलिंद कांबळे यांनी केळुसकर गुरुजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गुरु-शिष्य नात्याचा खास उल्लेख केला. केळुसकर गुरुजींनी तरुण भीमरावांची बुद्धिमत्ता आणि क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले होते. त्यांनी लिहिलेले भगवान गौतम बुद्धांचे चरित्र डॉ. आंबेडकरांना भेट दिले. डॉ. कांबळे म्हणाले, “ती केवळ एका पुस्तकाची भेट नव्हती, तर एका विचाराची भेट होती. शिक्षकाचा विश्वास आणि मार्गदर्शन विद्यार्थ्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते.” त्यांनी रेंज हिल्स हायस्कूलला शैक्षणिक गुणवत्ता, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास, उद्योजकता, क्रीडा आणि मूल्यशिक्षण यांचा संगम असलेली भविष्यासाठी तयार आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा संकल्पही व्यक्त केला. पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे अभिनंदन करताना डॉ. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना “नोकरी घेणारे नव्हे, तर नोकरी देणारे बना,” असा प्रेरणादायी संदेश दिला.
Source link
तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शिक्षकांचे महत्त्व कायम:रेंज हिल्स हायस्कूलमध्ये ‘केळुसकर गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार’ वितरण