![]()
तांदुळवाडी ते घोडेगाव, डोमेगाव रस्त्याचे रुंदीकरण करून सिमेंट काँक्रीटीकरण करावे तसेच परिसरातील इतर जोड रस्त्यांचे डांबरीकरण करावे, या मागण्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रशासनाने योग्य पावले न उचलल्यास १ सप्टेंबर २०२६ पासून घोडेगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार आहेत. या संदर्भातील निवेदन तहसीलदारांना देण्यात आले असून त्यावर ३० हून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. घोडेगाव ते कनकोरी, सिद्धनाथ वाडगाव, खादगाव आणि पळसगाव या चारही २-२ किलोमीटरच्या जोड रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. स्वातंत्र्यानंतर आजतागायत संबंधित विभागाने या रस्त्यांवर मुरुमाचा एक कणही टाकला नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत या सर्व रस्त्यांच्या मजबुतीकरणाचे काम मार्गी न लागल्यास, १ सप्टेंबर रोजी मंगळवारपासून घोडेगावजवळ रस्त्यावरच ग्रामस्थ बेमुदत साखळी उपोषणाला बसतील, असा थेट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. ३० वर्षांपासून रस्त्याची डागडुजी नाही गंगापूर तालुक्यातील घोडेगाव ते तांदुळवाडी या ५ किलोमीटरच्या रस्त्याचे काम होऊन तब्बल ३० वर्षे उलटली आहेत. या मार्गावर गुडघाभर खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच डोमेगाव ते घोडेगाव रस्ता गेल्या ३-४ वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत पडून आहे. हा मार्ग औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार आणि छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
Source link
तांदुळवाडी ते घोडेगाव रस्त्याची अवस्था बिकट; विद्यार्थ्यांचे हाल:पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा 1 सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा